Wednesday, 29 March 2017

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव! -- सुहास पळशीकर (Page 1)

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली बहुचर्चित कादंबरी. खंडेराव हा या कादंबरीचा नायक. या नायकाच्या आत्मसंवादातून लेखकाने भूत आणि वर्तमानातील माणसाच्या जगण्याचा मोठा पट मांडला आहे. मोठा आवाका असलेली अशी कादंबरी मराठीत दुर्मिळच. साहजिकच कौतुक, वाद, टीका असं सारं काही या कादंबरीच्या बाबतीत होत आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलेली या कादंबरीची चिकित्सा.

ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य
या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ,
साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ.
-भालचंद्र नेमाडे
‘हिंदू-’चा उपोद्घात.

खानदेशातल्या खंडेरावाची ही गोष्ट. सांगतोय कोण, तर खंडेरावच. पण खरं तर तो सांगतही नाहीये. मुख्यत: स्वत:शीच बोलतोय तो. एका बऱ्यापैकी संपन्न शेतकरी कुटुंबातल्या खंडेरावाचे वडील नुकतेच मृत्यू पावले आहेत आणि (त्याचा दुसरा भाऊ आधीच वारलेला असल्यामुळे) घराचं कर्तेपण आता खंडेरावाच्या खांद्यावर येऊ घातलं आहे. पण खंडेराव तर किती तरी आधीपासूनच कुटुंबापासून दूर गेला आहे. त्याला नातेवाइकांचे उबगवाणे हिशेब आणि शेतीमधली सामूहिक असुरक्षितता यांच्याबद्दल पूर्वापार तसा दुरावाच. पुस्तकं वाचावीत, स्वत:ला प्रश्न विचारावेत, जगाकडे तिरकस आणि चौकस नजरेनं पाहावं- आणि हे सगळं करण्यासाठी कुटुंब, गाव, शेती यांच्यापासून बाजूला राहावं, अशीच खंडेरावाची नेहमीची धडपड. टूरिस्ट गाइड बनण्याचा एक कामचलाऊ कोर्स करण्याच्या निमित्ताने तो गावाबाहेर पडतो, मग मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आर्किऑलॉजी शिकायला लागतो, आणि पुढे पीएचडीसाठी संशोधन करताना वडलांचा मृत्यू त्याला त्याने जे जे काही दूर ठेवायचा प्रयत्न केला त्या सगळ्या रगाड्याकडे परत ओढून आणतो.
‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी तब्बल ६०३ पानांची आहे. (लवकरच तिच्यावर लिहिल्या गेलेल्या पानांची संख्या त्याहून जास्त होईल!) अशा या कादंबरीला हे एकदम सुटसुटीत कथानक. वडील आजारी असल्याचं खंडेरावाला कळतं तिथपासून वडिलांच्या मृत्यूनंतरचे वेगवेगळे विधी करून सुतकातून मोकळं होण्याच्या दिवसापर्यंतचा काळ हा या कादंबरीचा मुख्य कालखंड; पण खंडेरावाच्या आयुष्यातल्या या एका घडामोडीच्या आणि मर्यादित कालखंडाच्या उंबरठ्यावर उभा राहून खंडेराव स्वत:शी जे बोलतोय त्याला मात्र स्थळ-काळ-व्यक्ती यांच्या मर्यादा नाहीत. त्या आत्मसंवादातून ही कादंबरी उलगडते. म्हणजे एकापरीने खंडेरावाचं साधारण पंचवीस-तीस वर्षांचं आयुष्य आणि त्या आयुष्यात त्याने गाव आणि कुटुंबाबद्दल साचवलेल्या समज-अपसमजांच्या राशी या निमित्ताने तो धुंडाळत-उलगडत बसला आहे. त्यामुळे ही कादंबरी खानदेशातून पाकिस्तानात, तिथून मराठवाड्यात, अशी कुठेही संचार करते आणि भूतकाळाचा कोणताही कोनाडा तिला वर्ज्य नाही.
अर्वाचीन मराठी साहित्याचा एकूण आवाका आणि दारिद्र्य लक्षात घेता ‘हिंदू-’ ही काही मराठीला शोभणारी कादंबरी नाही. त्यामुळे या कादंबरीवर कौतुक-निंदेचा आणि बक्षिसांचा कितीही वर्षाव झाला तरी ती कादंबरी नेमकी काय म्हणते आहे/ काय करते आहे याचा शोध जिकिरीचाच ठरेल. कारण तिला तोलण्याचा मानदंड मराठीत सहजी उपलब्ध नाही. गेली सुमारे पंचवीस-तीस वर्षं या कादंबरीच्या आगमनाबद्दल अधूनमधून बोललं जायचं. कारण नेमाड्यांनी ‘हिंदू’ या नावासह कादंबरीलेखनाचा मनोदय पूर्वीच जाहीर केला होता. पुढे ते स्वत:च जगण्याच्या समृद्ध अडगळीत अडकले. असं म्हणतात, की कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि प्राध्यापक म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या मनोभावे (इमाने-इतबारे) पार पाडण्याच्या अट्टहासापायी कादंबरीलेखन लांबलं. (प्राध्यापकांना भरपूर काम असतं, हे भारतात तरी कधी ऐकलं नव्हतं. पण नेमाड्यांचं सगळंच वेगळं.) गमतीचा भाग म्हणजे प्रत्यक्षात ही कादंबरी येऊन, वाचली जाऊन तिचा गवगवा होऊ लागण्यापूर्वीच नेमाड्यांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस झालीसुद्धा होती. कारण या कादंबरीच्या महतेबद्दल अनेक हितचिंतकांना खात्री होती. (जशी ओबामांच्या नोबेल कर्तृत्वाबद्दल जगाला आधीपासून खात्री आहे तशीच!) पण हा वाह्यातपणा बाजूला ठेवू आणि ‘हिंदू-’चा विचार करू.
एव्हाना बहुतेक पुरोगामी मंडळींनी कादंबरीतील जातिप्रश्नाच्या आकलनाच्या मुद्द्यावर बोट ठेवून या कादंबरीवर बऱ्यापैकी कडक टीका केली आहे. दुसरीकडे, या कादंबरीच्या शीर्षकातल्या ‘हिंदू’ शब्दामुळे कान टवकारलेल्या आणि डोळे वटारलेल्या काही हिंदू संघटना ‘अडगळ’ शब्दामुळे बिथरल्या. (जालन्यात तर नेमाड्यांना पोलिस संरक्षणात शहराबाहेर पोचवावं लागलं. त्या निमित्ताने पोलिस संरक्षणाचा मान मिळणारे नेमाडे हे पहिलेच (?) मराठी साहित्यिक ठरले!) अशा टोकाच्या प्रतिक्रिया हे समाजाच्या अपरिपक्वतेचंही लक्षण आणि कादंबरीमधल्या शक्यतांच्या श्रीमंतीचंही लक्षण म्हणायला हवं. त्यामुळेही या कादंबरीविषयी लिहिणं अवघड ठरतं.
इतर कोणत्याही मुद्द्याविषयी लिहिण्याआधी या कादंबरीचं एक महान श्रेय नोंदवायला हवं. ते म्हणजे या कादंबरीतली मराठी भाषा. मराठीबद्दल रडून रडून बोलण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे; पण ‘हिंदू’ मध्ये आपल्याला आत्मविश्वाबसाने ओतप्रोत भरलेली, संवादात कोठेही न अडखळणारी सशक्त मराठी भेटते आणि दिपवून टाकते. या कादंबरीतली मराठी हा खरं तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा, संवादभाषा आणि निवेदनभाषा, अशा भिन्न रूपांमध्ये ‘हिंदू-’ मधली मराठी सहजगत्या वावरते. तिला जसे बोलीभाषांविषयी ‘पुरोगामी’ प्रश्न पडत नाहीत तसेच जुनी-नवी, शुद्ध-अशुद्ध यांचेही प्रश्न पडत नाहीत. स्वत:च्या कथनावर लेखकाचा विश्वास असला आणि निवेदनाची ऊर्मी असली की भाषा कशी साकारते याचा विस्फारून टाकणारा अनुभव ही कादंबरी देते. अर्थातच त्याची इथे जास्त चर्चा केलेली नाही, कारण तो या लेखाचा मुख्य विषय नाही.
खंडेराव काय म्हणतो आहे याचा अर्थ शोधणं आणि नेमाडे काय सांगताहेत याचा अंदाज घेणं एवढ्यापुरताच हा लेख मर्यादित आहे.
-१-
माणसांची आयुष्यं म्हणजे फक्त बुडबुडा; पण तो निरर्थक न ठरो... सभोवताल खिन्न असला तरी जगण्याची समृद्ध अडगळ घर भरून राहो, या सदिच्छेने सुरुवात करीत नेमाडे आपल्यापुढे खंडेरावाची गोष्ट मांडतात. आपण खंडेरावाच्या गोष्टीचं जेमतेम पहिलं पान उलटतो आणि एक धारदार द्वैत खंडेराव आपल्या पुढ्यात आणून उभं करतो : श्रमकेंद्री कृषिसंस्कृती आणि तिच्या मुळावर उठलेली ‘नागरी, ऐतखाऊ’ संस्कृती. तरी आधीच खंडेरावाला बजावलेलं आहे, ‘खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.’
आणि मग पुढे खंडेराव आपलं आयुष्य, आपलं गाव, कुटुंबाचा आणि गावाचा इतिहास, सिंधू संस्कृतीचा इतिहास यांची गोष्ट करता करता याच द्वैताचे अनेकविध पदर आपल्यापुढे उलगडत राहतो. चमकदार चिकित्सा, भारावणारी वर्णनं, संयत भावनिकता, श्रीमंत शायरी, भरगच्च शिव्या (उर्दू शायरी आणि मराठी वळणाच्या शिव्या. त्यामुळे असं म्हणतात, की नेमाड्यांना महाराष्ट्र उर्दू अकादमीची शिष्यवृत्ती द्यावी की साहित्यसंस्कृती मंडळातर्फे शिव्यांचा शब्दकोश बनवण्यासाठी पाचारण करावं यावर चर्चा चालू आहे.) आणि रांगडेपणा या सगळ्यांमधून सतत डोकं वर काढत राहतात ती दोन परस्परविरुद्ध अस्तित्वं. गाव आणि शहर. शेती आणि बिगरशेती व्यवस्था. आधुनिक आणि आधुनिकपूर्व. पुरुषसत्ता आणि त्यात अवकाश शोधणाऱ्या स्त्रियांची धडपड. या सगळ्या द्वैतांमधली विषमता खंडेराव नेमकी पकडतो. प्रत्येक द्वैतातला वर्चस्वसंबंध तो शोधत आणि सांगत जातो. नुसता सांगून थांबत नाही. प्रत्येक वर्चस्वसंबंधातल्या कनिष्ठाची तो बाजू घेतो. अशा प्रकारे कनिष्ठाचा पक्षपात करणारी निवेदनं कादंबरीभर पसरलेली आहेत. ग्रामीण, शेती, ‘कनिष्ठ’ मानलेल्या जाती, भटके, बायका, असं करीत करीत माणूस आणि जनावरं यांच्यात खंडेराव जनावरांचा पक्षपाती आहे!
पण म्हणजे ही कादंबरी सरसकट आणि थेटपणे अन्यायाचा विरोध करते का? तर तसं काही घडत नाही. फक्त निवेदक खंडेराव याला अन्यायग्रस्तांच्या अन्यायग्रस्ततेची जाणीव आहे आणि त्या अन्यायग्रस्ततेची कारणमीमांसा करण्याची त्याची मनातल्या मनात धडपड चालू आहे.
नेमाड्यांचा निवेदक ही कारणमीमांसा कशी करतो? कादंबरी सुरू होते ती नागरी संस्कृतींच्या धिक्काराने. त्यामुळे समाजातल्या ‘बिघाडी’ची मीमांसा करण्याचा एक रस्ता उलगडतो. जेव्हा नागरी संस्कृती वरचढ होतात तेव्हा विरुद्ध श्रेयसाचा संकोच होतो. या आकलनात- त्याच्या पोटात गाव विरुद्ध शहर आणि शेती विरुद्ध उद्योग-व्यापार अशा दोन द्वैतांचा समावेश आहे. ‘...ही खेडी अशी निष्पाप, साधी, उदार मनाची राहतील?’ असा सवाल नेमाड्यांचं एक पात्र विचारतं (पान २७). हे खरं तर वाचकाला एकदम सावध करणारं वाक्य म्हणायला हवं. कारण त्यातून एका बाजूला खेड्याची एक आदर्शवत कल्पना प्रस्थापित होते, तर दुसरीकडे शहर म्हणजे लबाडी, गुंता, अनुदारपणा यांचं कोठार, असं दुसऱ्याच टोकाचं चित्र तयार होतं.
अशी खेडी कुठे असतात हो? पण लहान वस्त्या, अ-नागरी समुदाय हे जास्त सुटसुटीत, बहुविधतानुकूल, समावेशक असतात, असं उदात्तीकरण मांडणारा एक विचारप्रवाह अस्तित्वात आहे. त्याचं प्रतिनिधित्व हा बेटा खंडेराव करतोय की काय?
पण खंडेराव लबाड किंवा दांभिक नाही. त्यामुळे गोष्ट सांगण्यात तो रमत जातो, तसा मोरगावाच्या भानगडी, तिथल्या कमतरता यांच्याबद्दलही दिलखुलासपणे बोलतो. म्हणजे कादंबरीत आपल्याला ‘गाव’ नावाची एक आदर्श संकल्पना भेटते आणि एक खरंखुरं गावही भेटतं. ते गाव ‘खरं’ आहे. त्याच्याबद्दल कादंबरीकार हातचं राखून ठेवत नाही. पण तरीही खंडेरावाचं मोरगाव हे त्याच्या आदर्शवत गावाच्या संकल्पनेतून साकारलेलं पिल्लूच आहे. त्यामुळे त्याचा ‘खरेपणा’ सांभाळत या कादंबरीत पानंच्या पानं ग्रामव्यवस्थेची गौरवगीता पुन्हा पुन्हा आळवली जाते. (या गौरवगीतेतच शेतीव्यवस्था/शेतकरी आणि गावातली जातिव्यवस्था यांचेही स्वतंत्र अध्याय येतातच.)
गावाच्या नावाने कढ आणत स्मरणरंजन करणारे नमुने मराठी साहित्यात बक्कळ सापडतील. तेच नेमाडेही करत असते तर आपण त्यांना ‘बिच्चारे नेमाडे’ असं म्हणून सोडून दिलं असतं. पण नेमाड्यांचा खंडेराव खंबीर भूमिका घेतोय. उदाहरणार्थ, तो गाव म्हणजे गरीब (शेतकरी), असं समीकरण मांडतो आणि ‘नैतिकतेचं ओझं वाहत आल्यानं’ हे लोक जगात हास्यास्पद ठरले की काय, अशी शंका व्यक्त करतो. गावातली व्यक्तिचित्रणं किती सहृदयपणे येतात हे कादंबरीत मुळापासूनच वाचण्यासारखं आहे. त्याउलट, शहरांबद्दल बोलताना खंडेराव तिथल्या कष्टक-यांना, गरिबांना विसरून जातो आणि नेमकी उदाहरणं देतो ती पैसेखाऊ, दारुड्या किंवा बाईबाज लोकांची. गावातल्या काही मुलींसाठी शहरातले जोडीदार निवडण्याचे आग्रह धरले गेले, हे वाचताना आपल्याला क्षणभर वाटतं, की गावातल्या भानगडी आणि घुसमटीतून काहीजण बाहेर पडतायत असं खंडेराव म्हणतोय- ‘खेड्यातल्या या दोड्या वाड्यांपेक्षा शहरातली भाड्याची का होईना, एक खोली बाईला सुखाची होते...’ (१८९). पण नेमक्या त्याच मुलीच्या आयुष्याची परवड झाल्याचा उल्लेख (५८४-८६) न चुकता येतो!
ग्रामीण जीवनातील त्रुटी मान्य करतानाच ही कादंबरी अगदी स्पष्टपणे ‘ग्रामीण म्हणजे अस्सल’ अशी भूमिका घेते आणि त्या अस्सलाच्या पलीकडच्या शहरीपणावर तुटून पडून जमेल तेवढे बोचकारे घेते. त्यासाठी अर्थातच जशी ‘ग्रामीण’ नावाची एक उदात्त/आदर्श वस्तू कल्पिली आहे, तशीच खंडेरावाने शहरी जीवनातल्या मर्यादा व विपर्यास ठळक करून-बटबटीत करून ‘शहरी’ नावाची एक खुजी/रोगट वस्तू कल्पिलेली दिसते. खंडेराव युनेस्कोच्या शिष्यवृत्तीसाठीच्या चर्चासत्रात निबंध सादर करून एक ‘दे दणादण’ भाषण करतो (त्याची चर्चा पुढेही करूच), त्या वेळी तिथे त्याचा गावातला वर्गमित्र अचानक हजर असलेला खंडेरावाला दिसतो. त्याचं हे वर्णन पहा : ‘भयंकर न धुतलेला मफलर, घामनक्षीची गांधी टोपी आणि पूर्ण काळी होत आलेली सदऱ्याची परंतु चर्चासत्रात जमलेल्या त्या हॉलमधला सर्वांत तेजस्वी चेहरा (५४९). तेजस्वी का रे बाबा? तर खंडेरावाच्या डोळ्याला त्या रघू नायकचं तेज दिसलं म्हणून! आणि मग त्या रघूचा बेहद्द लोभसवाणा संवाद सुरू होतो. आपल्या घामनक्षीच्या टोपीचं त्यालाही भान आहेच आणि आपण आणि हे शहरी ‘बुद्धिजीवी’ यांच्यातल्या विरोधाभासाचीही त्याला जाणीव आहे. (शेवटी खंडेरावाचाच तो मित्र!) त्यामुळे मग लेखक रघूच्या तोंडून शहरीपणावर बोचकारा काढतो : ‘....आम्ही कष्टकरी लोक असेच राहणार. (परिस्थितीमुळे की निवड म्हणून? हा प्रश्न रघू किंवा खंडेराव विचारत नाहीत, कारण त्यांना ‘असेच राहण्याचे’ कुठे तरी उदात्तीकरण करण्याचा मोह पडतोय.) तुम्ही बुद्धिजीवी राहा गांडींना पावडरी न् अत्तरं लावून छानछोकीत.’ (५४९) छानछोकी आणि त्या छानछोकीची ही कल्पना शहरीपणाशी जोडून गाव आणि शहर यांचं द्वैत रंगवणं कित्ती कित्ती सोपं किनई खंडेराव?
‘ऐतखाऊ’ नागरी संस्कृतीची चिकित्सा करण्यासाठी गरज होती ती तिच्या शक्तिस्थानांसह तिच्या हतबल मर्यादांची गोष्ट सांगण्याची, स्वप्नं दाखवून ती अपुरी ठेवण्याच्या तिच्या कमकुवतपणावर बोट ठेवण्याची. नेमाडे दोन्ही बाजूंनी सोपा मार्ग चोखाळतात. एक तर ते गाव नावाची एक आदर्श गोष्ट रचतात आणि दुसरीकडे शहर नावाचा एक विक्राळ खलनायक रंगवतात. हे अर्क चित्रीकरण त्यांच्याच वैचारिक प्रकल्पाला हानी पोचवणारं आणि त्यांना स्मरणरंजनशील ‘गड्या आपुला गाव बरा’ वाल्या मराठी साहित्यिकांमधला एक जरा जास्त स्मार्ट झीलकरी बनवणारं आहे.

सोयगावकरांचा सोयीचा निषेध --संजय पवार

सोयगावकरांचा सोयीचा निषेध
संजय पवार
  • गडकरी यांचा संभाजी ब्रिगेडने उखडलेला पुतळा
  • Tue , 10 January 2017
४ जानेवारी २०१६च्या दै. लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये ‘वेध’ या सदरांतर्गत एक छोटंसं टिपण प्रकाशित झालं आहे. ‘लोटू पाटलांचे सुसंस्कृत सोयगाव’ असं त्या टिपणाचं शीर्षक आहे. लोटू पाटील आणि सोयगाव ही दोन्ही नावं वेगळी वाटल्याने ‘वेध’ वाचलं. अजिंठा लेण्यांच्या कुशीत हे सोयगाव वसलं असून मराठवाडा साहित्य परिषदेचं ३८वं साहित्य संमेलन या सोयगावात पार पडलं. आजही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘गैर’सोयगाव असणाऱ्या या गावात अत्यंत नेटक्या व साध्या पद्धतीने संमेलन पार पडलं असा वृतान्त या टिपणात आहे. या गावाशी रानकवी ना. धों. महानोरांचंही नाव जोडलं जातं. पण महानोरांच्या आधीपासून ते लोटू पाटील नावाच्या अवलिया रंगकर्मीचं सोयगाव म्हणून ओळखलं जातं.
‘रंगकर्मी’ हा शब्द जन्माला यायच्या आधी, म्हणजे पाऊणशे वर्षांपूर्वी या गैरसोयीच्या, आडवळणाच्या सोयगावात लोटू पाटलांनी उत्तमोत्तम नाटकं केली! स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी नाटकं तर केलीच, पण जयराम-जयमाला शिलेदार, दामूअण्णा मालवणकर, नूतन पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर या त्या काळातल्या महनीय, लोकप्रिय कलाकारांनी सोयगावात हजेरी लावून प्रयोग केले. हे करण्यामागे लोटू पाटलांचा हेतू हा की, या दिग्गजांना बघून स्थानिक कलाकारांनी काही शिकावं! (अलीकडची नाट्य प्रशिक्षण शिबिरं आणि मुंबईबाहेर पनवेलला प्रयोग लावायचा म्हटला तर निर्मात्यांच्या अंगावर कलाकार, तंत्रज्ञ मंडळी जो काटा आणतात, त्या पार्श्वभूमीवर धन्य ते लोटू पाटील आणि धन्य ते लोकप्रिय कलाकार!) ‘कवडीचुंबक’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ अशी त्या काळातील गाजलेली नाटकं सोयगावात ‘ओरिजिनल संचात’ (!) झाली! ‘श्रीराम संगीत मंडळ’ नावानं नाटकांची सांस्कृतिक चळवळ पाऊणशे वर्षांपूर्वी सोयगावात रुजवणाऱ्या लोटू पाटलांनी याच सोयगावात जयराम व जयमाला शिलेदार यांचा विवाहही लावून दिला! असे हे लोटू पाटील आणि त्यांचं सोयगाव!
हे टिपण ज्या दिवशी प्रसिद्ध झालं, त्याच दिवशी पहिल्या पानावरची बातमी होती- संभाजी ब्रिगेडनं उखडला राम गणेश गडकरींचा पुतळा, मुठा नदी पात्रात फेकून दिला : सांस्कृतिक-सामाजिक वर्तुळातून तीव्र निषेध. पुण्याच्याच संभाजी बागेतला (पार्कातला!) हा अर्धपुतळा आदल्या रात्री संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उखडून थेट नदी पात्रात फेकून दिला. त्याची जबाबदारी घेत हे कृत्य करणाऱ्यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभीही राहिली.
पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर काही वर्षांपूर्वी केलेल्या विध्वंसक हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडने पुण्यात केलेला हा तिसरा हल्ला. भांडारकरशी संबंधित डॉ. श्रीकांत बहुलकर यांना धमकी देणं, काळे फासणं असा एक छोटा हल्ला मध्यंतरी झाला.
भांडारकर संस्था व बहुलकर यांच्यावरील हल्ल्यामागे कारणीभूत होते जेम्स लेन लिखित शिवाजी महाराजांवरील पुस्तकात राजमाता जिजाऊंबद्दलची आक्षेपार्ह विधानं, तर गडकरींचा पुतळा उखडण्यामागे कारण आहे गडकरींनी त्यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकात संभाजीराजांची उभी केलेली बदनामीकारक प्रतिमा.
आता सुरुवातीला दिलेल्या सोयगावच्या माहितीचा आणि या गडकरी पुतळा विध्वंसाचा काय संबंध असं तुम्हाला वाटेल. पण आम्ही तो कसा व का ते सांगतो. गैरसोयींना बाजूला सारून लोटू पाटलांनी सोयगावचं नाव सार्थ केलं. पण गडकरी पुतळा उखडण्याच्या निमित्तानं मराठी नाट्यपरिषदेसह मराठी नाट्य-चित्रपट-मालिका कलाकार व तंत्रज्ञांनी जो काही उत्स्फूर्त आणि पोटतिडकीनं निषेध केला ते पाहून आम्हाला वाटलं, या मंडळींनीही आपआपलं एक सोयगाव तयार केलंय. पण लोटू पाटलांप्रमाणे ते गैरसोयीच्या सोयगावपेक्षा सोयीच्या सोयगावचा रस्ता धरतात!
रेखाचित्र - संजय पवार
म्हणजे बघा, त्या दिवशी चार तारखेला बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात संभाजी ब्रिगेडचा निषेध करायला सात्त्विक आणि सांस्कृतिक संतापानं ही सर्व मंडळी थरथरत होती. याच संभाजी ब्रिगेडने पंधरवड्यापूर्वी कोल्हापुरात ‘हे राम, नथुराम’ या नाटकाच्या बोर्डाला काळं फासून प्रयोग कोल्हापुरातच काय महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा दम देऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला घेराव घातला होता. शेवटी शरद पोंक्षेंनी तो प्रयोग पोलिस बंदोबस्तात केला, तेव्हा ही सर्व मंडळी कुठे होती? तिथंही ‘न पटणाऱ्या विचाराला, लेखनाला, कलाकृतीला विरोध’ हेच सूत्र होतं ब्रिगेडचं. पण त्यावरचा निषेध वाचायला मिळाला नाही.
नथुरामच्या बाबतीत सोयीच्या सोयगावकरांची गैरसोय ही झाली असावी की, ब्रिगेडला विरोध म्हणजे पर्यायाने नथुरामला पाठिंबा आणि नथुरामची बाजू धरावी तर पर्यायाने गांधींना विरोध! नथुराम की गांधी? पोंक्षे की संभाजी ब्रिगेड? या टु बी ऑर नॉट टु बी मध्ये हे सव नव-सोयगावकर सोयीस्कर शांत राहिले!
परवाच्या संतप्त सुरातले काही सूर जे होते, त्यांची थोडीशी पूर्वपीठिका आपण पाहू. मग सोयीचे सोयगावकर अधिक समजून घेता येतील.
या संतप्त सुरात एक सूर होता ज्येष्ठ रंगकर्मी लेखक\दिग्दर्शक\अभिनेता योगेश सोमण यांचा. साधारण पंधरा-वीस (कदाचित जास्त) वर्षांपूर्वी पुण्याच्या त्यावेळच्या लोकप्रिय सोहम करंडक एकांकिका स्पर्धेत श्रीरंग गोडबोले लिखित ‘रामभरोसे’ (नाव नक्की आठवत नाही) या एकांकिकेत राम, सीता व एकुणच रामायण, पर्यायाने हिंदू दैवताची टिंगलटवाळी, विटंबना केली म्हणून त्यावेळच्या शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेने दुसऱ्या दिवशी भरत नाट्य मंदिरात घुसून स्पर्धा बंद पाडली. श्रीरंग गोडबोलेंना बोलवून रंगमंचावरच काळं फासण्यात आलं. त्यांना माफी मागायला लावली, आयोजकांना दमदाटी केली. रंगमंचावरील नटराज मूर्तीसह सर्व गोष्टींचा नासधूस केली. ती रात्र संपली. श्रीरंग गोडबोले भारतीय विद्यार्थी सेनेचे त्यावेळचे प्रमुख राज ठाकरे यांचे मित्र कम प्रसिद्धी प्रचार साहित्य निर्मिती करणारे. त्यामुळे रात्रीच फोन आला व प्रकरण शांत झाले. राज्यात युतीचं सरकार व भाजप तेव्हा धाकटं भावंड! सेना शांत झाली म्हणताच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाने भरत नाट्यमंदिर गाठलं. रंगमंचाचं शुद्धीकरण केलं आणि श्रीरंग गोडबोलेंची संहिता भर रंगमंचावर जाळण्यात येऊन देशप्रेमाच्या घोषणा देण्यात आल्या. शुद्धीकरण व संहिता जाळण्याचे सूत्रधार होते सन्माननीय योगेश सोमण!
आता मंडळी आम्हाला सांगा बदनामीकारक लेखन भर रंगभूमीवर जाळणं आणि बदनामीकारक लेखन केलं म्हणून त्या लेखकाचा पुतळा उखडणं यात गुणात्मक फरक काय? यातली कुठली निषेध पद्धत उजवी अथवा डावी ठरवता येईल?
म्हणजे गांधी खुनाचा समर्थक पोंक्षेकृत नथुराम (कारण मूळ दळवींचा नथुराम पोक्षेंनी अधिक कडवट केलाय) आणि त्याला विरोध करणारी ब्रिगेड नाट्यपरिषद व रंगकर्मींना निषेधार्ह वाटत नाही, पण त्याच ब्रिगेडने संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गडकरींचा पुतळा उखडला की निषेधार्ह?
याच संतप्त सुरात एक सूर प्रसाद ओक यांचाही होता. पण गंमत अशी आहे ओक जेवढे जोरात संतापतात, तेवढ्याच वेगात ते सोयीने शांत होतात. म्हणजे झी मराठी वाहिनीचे ते काही वर्षांपूर्वी डार्लिंग होते! झी मराठीच्या संगीत स्पर्धेत त्यांनी सुमित राघवनवर विवादास्पद जेतेपद मिळवत ते झी मराठीचे अजिंक्य तारा म्हणून ब्रँड अम्बॅसिडरही झाले! पण पुढे त्यांचेच परममित्र पुष्कर श्रोत्री व झी मराठी वाहिनीने चेष्टेचेष्टेत त्यांची एवढी मस्करी केली की, तो विनोद की जाहीर बदनामी असा संशय सामान्य रसिकांनाही पडला. मग चवताळलेल्या ओकसाहेबांनी झी मराठीला आवाजच दिला. पार रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत टाईप्स. मध्ये काही काळ गेला. आणि एक दिवस झी मराठीच्या ‘होणार सून मी…’ या मालिकेत ओक प्रकटले! सोयगावकर तयार होतात ते असे!
अशा लोकांनी शपथा वगैरे घेत, आविष्कारस्वातंत्र्य, जात, धर्म यावर तणतणत बोलावे? ओकांचेच परममित्र आणि आघाडीचे अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली, ‘पुतळा सन्मानपूर्वक बसवेपर्यंत पुण्यात प्रयोग करणार नाही!’ फेसबुकच ते! दुसऱ्या क्षणापासून श्रोत्रींना आपल्या ‘लोकप्रियते’चा प्रत्यय आला. आपला पुतळा व्हायच्या आतच मुळासकट उखडून टाकलो गेलोय हे त्यांच्या लक्षात आलं असावं. प्रतिज्ञा कुणीही करू नये हा धडा सर्वांसाठीच!
खरं तर मराठी नाट्यचित्रसृष्टीतले काही सन्माननीय अपवाद वगळले तर बाकी सगळ्यांचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आकलन हे साधारण ‘पाचवी (ब)’ पातळीवरचं आहे. पूर्वी बाळासाहेबांपाशी लिन होणारे वाऱ्याची दिशा पाहून आता मातोश्री किंवा कृष्णभूवनला दंडवत घालतात. काहीजण सिद्धीविनायक आणि महालक्ष्मीप्रमाणे एकाच तिकिटात दोन्ही बसस्टॉप करतात!
राज्यात होणाऱ्या विविध पालिका निवडणुका, एक मराठा-लाख मराठा या बिगर नेतृत्वाच्या समूहाला आपल्याकडे वळवण्यासाठी उत्सूक सर्व राजकीय पक्षांसह सर्व मराठा संघटना या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने स्वत:ची राजकीय पक्ष म्हणून केलेली नोंदणी, हा ताजा इतिहास लक्षात न घेता राणाभीमदेवी थाटात सूर लावणं म्हणजे अंधारात कुत्र्याचं केकाटणं.
संभाजी ब्रिगेडचा दावा असा – हा पुतळा हटवायची मागणी आठ वर्षं जुनी आहे. आठ वर्षांचा संयम आताच का तुटला असावा? कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मराठ्यां’ना दुखवण्याचं पातक कुठलाच राजकीय पक्ष करणार नाही, ही खात्री!
आणि झालंही तसंच! राजकीय पक्षांनी ऐकू जाईल असा निषेध केलाच नाही! ज्यांनी केला ते गडकरींवर व विध्वंसक वृत्तीवर बोलले. गडकरीकृत संभाजी महाराज बदनामी खरी की खोटी की त्या मागचा मेंदू कोण, यावर सर्वत्र चिडीचूप! संभाजी महाराजांची बदनामी सहन करणार नाही, याचा शूर पुरावा इतर कुणाआधी ब्रिगेडने ठेवून मराठा मतांवर आपला हक्क प्रस्थापित करण्याची सुरुवात केलीय. राजकीय पक्ष म्हणून शिवसेना आणि मनसे यांचीही सुरुवात अशीच अस्मितेच्या उद्रेकाची होती, हे आज शिवसेना व मनसेत कार्यरत रंगकर्मी व चित्रकर्मींनी विसरू नये. अथवा इतिहास वाचावा त्या पक्षांचा.
या सर्व प्रकारात गडकरी मास्तरांची नेमकी काय प्रतिक्रिया झाली असेल? अर्धपुतळ्यामुळे प्राणप्रिय व जिने प्राण घेतला ती बीडी कित्येक वर्ष शिलगावता आली नव्हती, ती मिळण्याची आशा पल्लवीत झाली असेल. आणि नदीत फेकताच किती दिवसांनी (का वर्षांनी) अंगाला पाणी लागल्याने मन सुखावलं असेल!
पुढे पोलिसांनी कहर केला. ‘एकच प्याला’ या नाटकाने अजरामर झालेल्या या लेखकाला डिजिटल पुरावा राहिला म्हणून नदीत दोनदा बुडवला! तालीममास्तर गडकरींवर या तालमींनी त्यांच्या स्वर्गस्थ सहकाऱ्यांनी सूडच उगवून घेतला बहुतेक.
या निमित्ताने गडकरींना तेव्हा न मिळालेलं कास्ट सर्टीफिकेटही मिळालं. ‘महाराष्ट्र देशा’ असं गीत लिहिणारा लेखक वादात सापडून मुळासकट उखडला जातो.
देशात इतिहासाचे पुनर्लेखन करू पाहणाऱ्या उजव्या व डाव्या या दोन गटांबद्दल पुरेसा अभ्यास नसताना, तारस्वरात काही बोलणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण हे आमच्या सोयीच्या सोयगावकर रंगकर्मी-चित्रकर्मींना लवकर कळेल तितकं बरं!
लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
http://www.aksharnama.com/client/article_detail/396

Wednesday, 8 March 2017

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव! -- सुहास पळशीकर (Page 4)

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली बहुचर्चित कादंबरी. खंडेराव हा या कादंबरीचा नायक. या नायकाच्या आत्मसंवादातून लेखकाने भूत आणि वर्तमानातील माणसाच्या जगण्याचा मोठा पट मांडला आहे. मोठा आवाका असलेली अशी कादंबरी मराठीत दुर्मिळच. साहजिकच कौतुक, वाद, टीका असं सारं काही या कादंबरीच्या बाबतीत होत आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलेली या कादंबरीची चिकित्सा.
नेमाड्यांचा खंडेराव मोरगावातल्या जातिव्यवस्थेकडे बहुश: एक आडवी व्यवस्था म्हणून पाहतो. (जाता जाता : पान ५४४-५४५ वर खंडेराव आपली भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी एक महावात्रट भाषण करून त्यात सर्व ‘उभ्या’ गोष्टींची यथेच्छ टवाळी करतो. त्याच भूमिकेतून तर तो उभी जातिव्यवस्था आडवी मानून चालत नसेल ना?) जातिव्यवस्थेत जातिजातींमध्ये वेगळेपणा आहे, अंतर आहे हे जेवढं खरं, तेवढंच त्या वेगळेपणाला, त्या अंतराला श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचं, उतरंडीचं अधिष्ठान आहे हेही लक्षात ठेवायला हवं. खंडेरावाचा जातविषयक दृष्टिकोन जास्त करून अनेकवादी (बहुविधवादी, प्लुरालिस्ट) आहे. त्यात नेमक्या ह्या अधिष्ठानाकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे मग जातींचे आपापले सांस्कृतिक संसार, त्या सांस्कृतिक अस्तित्वांचा सुटा गोडवा, गावातली सांस्कृतिक सरमिसळ आणि देवाणघेवाण, सहअस्तित्व, या सगळ्याची लोकगीतं गाणं शक्य होतं. पण मतलबाची गोष्ट असते ती उतरंडीची. तिच्याबद्दल खंडेराव बोलत नाही. उलट, त्याची गोष्ट देवाणघेवाण आणि सरमिसळ यांच्यावर एवढा भर देते की अन्याय आणि उतरंड या गोष्टी उपर्याद वाटायला लागतात. आणि पुन्हा यात कुठे तरी एक अशीही समजूत आहे, की कुणबी आणि बलुतेदार यांच्यात एकजीव संबंध आहेत- म्हणजे उपरा बांडगुळी (ब्राह्मण, मारवाडी) समाज, उत्पादक (कुणबी व इतर संलग्न बलुतेदार) समाज आणि संकीर्ण सेवक समाज अशी विभागणी क्वचित कुठे डोकावते. तीही कुणबीकेंद्रित आकलनाचाच भाग म्हणायला लागेल. पण या आडव्या पसरलेल्या व्यवस्थेत कोणाचं पक्कं वर्चस्व नाही की समावेशकतेला धूर्त अधिमान्यीकरणाचा स्पर्श झालेला नाही. वर्चस्व, अधिमान्यीकरण, विचारप्रणाली हे सगळं उत्क्रांत आधुनिकतेचं लटांबर. जातिव्यवस्था कशी गोजिरवाणी आडवी पहुडलेली, तिला उत्क्रांतीने उभी केली, असा सगळा आव.
-४-
नेमाड्यांची ही बहुप्रतिक्षित कादंबरी. तशीच ती आता बहुचर्चितही बनेल- तिच्या प्रचंड आवाक्यामुळे आणि समृद्ध अनुभव देण्याच्या ताकदीमुळे ती मराठी वाचकांमध्ये दीर्घकाळपर्यंत वाचली जाईल- कुतूहलाने, चवीने, क्वचित गंभीरपणे आणि अनेक वेळा भक्तिभावानेही. मराठी वाचणाऱ्याला क्वचितच मिळणारा स्तंभित करण्याचा अनुभव ती देत राहील. आपल्या कमअस्सल जगण्याचा गंड असलेल्या शहरी पांढरपेशांमध्ये ‘हिंदू-’ पापक्षालनासाठी वाचली जाईल. त्याउलट, आपल्या अस्सलसदृश जगण्याला प्रतिष्ठा नसल्यामुळे खंतावलेल्या निमशहरी/ग्रामीण वाचकांमध्ये कनिष्ठत्वाच्या क्षणिक भरपाईसाठी ‘हिंदू-’ वाचली जाईल. एकंदरीने, नेमाडेकृत खंडेरावगीता काही काळ मराठी वाचकांमध्ये पारायणली जाईल.
नेमक्या याच कारणासाठी ‘हिंदू-’च्या प्रगट/अप्रगट भूमिकांची उकल करणं आवश्यक बनतं. शहरांपेक्षा गावं अस्सल, उद्योगांपेक्षा शेती अस्सल, या नुसत्या चमकदार आदर्शरमणीय कल्पना नाहीत. आजही आपल्या भोवताली चालणाऱ्या समाजकारणात, संघर्षांत, युक्तिवादांमध्ये अशा भूमिका घेतल्या जातात आणि त्यांना नैतिक उच्चत्वाचा एक पदर असतो. उदात्ततेचा आणि त्यागाचा धागा त्यांच्यामागे असतो. ‘हिंदू-’ ही कादंबरी या घडामोडींचा पुसटही उल्लेख करीत नसली, तरी या सामाजिक वास्तवापासून तोडून खंडेरावाच्या उलघालीचा आणि कृती/आकृतींचा माग निघू शकत नाही.
खंडेरावाचा सगळा वैचारिक आकांत आहे तो जगण्याच्या सार्थकतेविषयीचा. प्रगती नावाच्या गोष्टीबद्दल तो अतोनात साशंक आहे. मनुष्यप्राण्याच्या विवेकावर आणि निर्णयशक्तीवर त्याचा विश्वाबस नाही. त्यापायी तो स्वत:वर मागासपणाचा, सनातनीपणाचा आरोप घ्यायलाही तयार आहे. मानवी स्वेच्छाशक्ती, मानवी हस्तक्षेप यांचा कोणालाच फायदा होत नाही, अशी त्याची भूमिका आहे. अगदी मित्रांमध्येसुद्धा जोडीदार निवडण्याच्या प्रश्नावर खंडेराव धाडकन ‘निवडीच्या थोतांडा’वर तुटून पडतो. त्याची तो ‘शहरी, उच्चवर्गी, भांडवलशाही आणि पाश्चात्त्य व्यक्तिवादी’ एवढ्या शिव्या देऊन संभावना करतो (५२३). त्याचा दोस्त मच्छिंदर त्याला पाठिंबा देत म्हणतो, ‘सनातनी असेल, पण मानवतावादी तर आहेच. आणि नादारांच्या हिताचाही.’
निवड, ती निवड करण्यासाठी पर्याय असण्याचा आग्रह आणि निवड करणाऱ्याची विवेकबुद्धी. खंडेराव या तिन्हींची थोतांड म्हणून वाट लावतो. मानवाचा इतिहास क्रौर्याशिवाय आणखी दुसरं काय सांगतो, असा त्याचा आव्हानात्मक प्रश्न आहे (५१९). संहार हेच माणसाचं संरक्षणाचं हत्यार आहे, असा त्याचा दावा आहे (५४६). परिस्थितीवर मात करण्याचा अहंकार, हे आजच्या मानवी संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं त्याला वाटतं. टिकून राहण्याची धडपड ही त्याला असंस्कृत वाटते. ‘प्रत्येकाच्या आयुष्याची कमाई हीच की तो मरतो... कुठल्याही संस्कृतीचा शेवट हाच असतो- एक संपल्याची अतीत फडफड. आपली आजची संस्कृतीही लवकर फडफडो, की सगळं शांत’ (५३३). पण ह्या क्रोधाविरुद्ध शापवाणीच्या जोडीनेच खंडेरावाला जगणं नावाच्या अडगळीतल्या समृद्धपणाची जाणीवही आहे. म्हणून त्याचा खरा प्रश्न ‘कसं जगायचं’ असा आहे. त्याला व्यक्तिवादाचा राग आहे, पण समुदायनिष्ठ जगण्यातली अडगळ तर त्याने आयुष्यभर अनुभवलीच आहे. तत्त्वत: ती अडगळ त्याला खुणावते, सुखावते; पण वडलांच्या मृत्यूनंतर आता त्या अडगळीवर स्वार होऊन जगायचं म्हटल्यावर त्याला हिंदू कुटुंबसंस्थेची गचाळ बाजू दिसायला लागते (५८३) आणि तो सारखं स्वत:ला बजावतो, की इथून निसटायचं बघावं (६०१). तीही निवडच. वैयक्तिक.
खंडेरावाचं जगणं, त्याच्यातले पेच, खंडेरावाची तात्त्विक भूमिका, या सगळ्यात विरोधाभास आहे, गुंता आहे. नेमाडे तो तसाच राहू देतात, सरळसोट कथानक तयार करीत नाहीत. कारण खंडेरावाच्या भूमिकेतील विसंगती आणि तणावांसह त्याच्या भूमिकेतील प्रश्न त्यांना पुढे आणायचे असावेत. उत्क्रांतीविषयीचं खंडेरावाचं वाह्यात भाषण म्हणजे त्याच्या भूमिकेचं एक टोक. माणसाची उत्क्रांती झाली हेच चुकलं, असा हा दावा! गावी परतल्यावर खंडेरावाची चुळबूळ आणि निसटण्याचा प्रयत्न हा व्यवहारात गचाळ असलेल्या नात्यांच्या नित्य जंजाळातून सुटण्याच्या कळत्या वयापासून चाललेल्या खंडेरावाच्या धडपडीचा भाग. म्हणजे समुदायमय जीवनापासून व्यक्ती म्हणून स्वत:ला सुटं करण्याची प्रगत सांस्कृतिक धडपड. आणि कादंबरीच्या शेवटी खंडेरावासाठी चाललेलं गार्हांणं तो तटस्थ-त्रयस्थपणे ऐकतोय- स्वप्नातही: ‘या घराची येल मांडवावरे चढू दे देवाऽ.... थोरल्या बायेच्या पुताच्या उंबरात लेकरं रांगू दे देवाऽ.’ खंडेराव स्वत:ला या अडगळीत अडकू देणार की काय? माणसानं आयुष्य येईल तसं आनंदानं जगत राहावं, ही स्वेच्छापूर्ण पराधीनता ही खंडेरावाच्या वैचारिक आकांताची तिसरी बाजू.
निवड, ती निवड करण्यासाठी पर्याय असण्याचा आग्रह आणि निवड करणाऱ्याची विवेकबुद्धी. खंडेराव या तिन्हींची थोतांड म्हणून वाट लावतो. मानवाचा इतिहास क्रौर्याशिवाय आणखी दुसरं काय सांगतो, असा त्याचा आव्हानात्मक प्रश्न आहे (५१९). संहार हेच माणसाचं संरक्षणाचं हत्यार आहे, असा त्याचा दावा आहे (५४६). परिस्थितीवर मात करण्याचा अहंकार, हे आजच्या मानवी संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं त्याला वाटतं. टिकून राहण्याची धडपड ही त्याला असंस्कृत वाटते. ‘प्रत्येकाच्या आयुष्याची कमाई हीच की तो मरतो... कुठल्याही संस्कृतीचा शेवट हाच असतो- एक संपल्याची अतीत फडफड. आपली आजची संस्कृतीही लवकर फडफडो, की सगळं शांत’ (५३३). पण ह्या क्रोधाविरुद्ध शापवाणीच्या जोडीनेच खंडेरावाला जगणं नावाच्या अडगळीतल्या समृद्धपणाची जाणीवही आहे. म्हणून त्याचा खरा प्रश्न ‘कसं जगायचं’ असा आहे. त्याला व्यक्तिवादाचा राग आहे, पण समुदायनिष्ठ जगण्यातली अडगळ तर त्याने आयुष्यभर अनुभवलीच आहे. तत्त्वत: ती अडगळ त्याला खुणावते, सुखावते; पण वडलांच्या मृत्यूनंतर आता त्या अडगळीवर स्वार होऊन जगायचं म्हटल्यावर त्याला हिंदू कुटुंबसंस्थेची गचाळ बाजू दिसायला लागते (५८३) आणि तो सारखं स्वत:ला बजावतो, की इथून निसटायचं बघावं (६०१). तीही निवडच. वैयक्तिक.
खंडेरावाचं जगणं, त्याच्यातले पेच, खंडेरावाची तात्त्विक भूमिका, या सगळ्यात विरोधाभास आहे, गुंता आहे. नेमाडे तो तसाच राहू देतात, सरळसोट कथानक तयार करीत नाहीत. कारण खंडेरावाच्या भूमिकेतील विसंगती आणि तणावांसह त्याच्या भूमिकेतील प्रश्न त्यांना पुढे आणायचे असावेत. उत्क्रांतीविषयीचं खंडेरावाचं वाह्यात भाषण म्हणजे त्याच्या भूमिकेचं एक टोक. माणसाची उत्क्रांती झाली हेच चुकलं, असा हा दावा! गावी परतल्यावर खंडेरावाची चुळबूळ आणि निसटण्याचा प्रयत्न हा व्यवहारात गचाळ असलेल्या नात्यांच्या नित्य जंजाळातून सुटण्याच्या कळत्या वयापासून चाललेल्या खंडेरावाच्या धडपडीचा भाग. म्हणजे समुदायमय जीवनापासून व्यक्ती म्हणून स्वत:ला सुटं करण्याची प्रगत सांस्कृतिक धडपड. आणि कादंबरीच्या शेवटी खंडेरावासाठी चाललेलं गार्हांणं तो तटस्थ-त्रयस्थपणे ऐकतोय- स्वप्नातही: ‘या घराची येल मांडवावरे चढू दे देवाऽ.... थोरल्या बायेच्या पुताच्या उंबरात लेकरं रांगू दे देवाऽ.’ खंडेराव स्वत:ला या अडगळीत अडकू देणार की काय? माणसानं आयुष्य येईल तसं आनंदानं जगत राहावं, ही स्वेच्छापूर्ण पराधीनता ही खंडेरावाच्या वैचारिक आकांताची तिसरी बाजू.
व्यवहाराच्या पातळीवर खंडेरावाला आधुनिक व पारंपरिक यांच्यातलं द्वंद्वात्मक नातं नक्कीच कळत असणार. त्याच्याच गावमित्रांची आणि वर्गमित्रांची उदाहरणं पाहिली तरी खंडेराव त्यांच्या ‘उन्नती’कडे तुच्छतेने पाहत नाही. मच्छिंदरचं फॉरेस्ट ऑफिसर होण्याचं स्वप्न किंवा वानखेडेचं परदेशी शिकायला जाण्याचं स्वप्न यांचा तो अनादर करताना दिसत नाही. गावगाड्याचं गुणगान करीत असतानाही तो रघूला ट्रक ड्रायव्हर व्हायला भरीला घालतो. लोटू न्हाव्याचं ‘लोटूज फायस्टार’ हे तर त्याच्या बैठकीचं ठिकाण. ‘चोर होऊ, दरोडेखोर होऊ, पण हा दारोदार बांगड्या भरायचा फकिरी धंदा नाही करणार’ (३८१) असं जेव्हा डोंगर मण्यार म्हणतो तेव्हा त्याला खंडेरावाचा मूक पाठिंबा असावा असंच वाटतं. आता हे सगळे आधुनिक विश्वांच्या दुष्टचक्रात सापडलेले मित्र. ते त्या आधुनिकातच कुठे अवकाश मिळेल का हे पाहतात, आणि तसं करण्यातली अपरिहार्यताच नव्हे तर निकड खंडेराव समजू शकतो. कारण दारिद्य्र आणि साधेपणा यातला फरक कळण्याएवढी समज त्याला आहे: ‘गरज आणि उणीव यांच्यातला माणुसकीचा फरक’ (१७८).
मंडी ही स्कॉटिश आर्किऑलॉजिस्ट. तिची पुरातत्त्व आणि आजचा समाज या दोन्हींची समज खंडेरावाशी मिळती- जुळतीच आहे. पण ती नवऱ्याला सोडून आली आहे आणि घटस्फोट घेणार आहे. ही निवड आधुनिक विश्वात (निदान आधुनिकपूर्वापेक्षा) जास्त सहज शक्य आहे, ही बाब खंडेरावाने टिपलीच असणार की.
म्हणून खंडेरावाच्या आकांतात पारंपरिक आणि आधुनिक यांचा संवाद नाही, ही फारच मोठी खटकणारी गोष्ट बनते. तो संवाद टाळण्यासाठीच जणू खंडेराव ‘पारंपरिक’ या संकल्पनेला शिवतही नाही. ही सगळी आपल्याच डोक्यातली अडगळ. खंडूचा सगळा राग उत्क्रांती नावाच्या अतिव्याप्त, अमूर्त, सतत चाललेल्या प्रक्रियेबद्दल आणि ती प्रक्रिया नावाजण्याच्या वृत्तीवर आहे. या दृष्टीने ५४४-५४९ या पानांवरचं खंडेरावाचं भाषण नमुनेदार आहे. उत्क्रांतीमुळे मनुष्यप्राणी हिंसक आणि असुरक्षित बनला, उत्क्रांती सर्वनाशी आहे, उत्क्रांतीत माणसाचं शरीर व मेंदू दोन्ही कमकुवत बनताहेत, करुणा आणि प्रेम या भावनाच उत्क्रांतीमुळे आता उत्पन्न होऊ शकत नाहीत... आणि हे थांबवणंही शक्य नाही, असं खंडेराव सांगतो. या सगळ्याकडे आपण अतिशयोक्ती म्हणून दुर्लक्ष करू शकतो. पण त्यानंतर यावरचा उपाय म्हणून खंडेराव जी जीवनपद्धती प्रशंसतो तिचा किंवा तत्सम पद्धतीचा पुरस्कार आजघडीला काही गट/विचार/व्यक्ती तरी करतातच. त्यामुळे खंडेरावाच्या त्या भाषणाला एक निश्चिीत समकालीन आधार आहे हे लक्षात ठेवायला हवं: ‘परिस्थितीशी जास्तीत जास्त जुळवून घेणे आणि आपल्याला आवश्यक असेल तेवढीच परिस्थिती बदलणे...’ (५४८). आधुनिक व पारंपरिक विचारविश्वांमधला फरक इथे लख्खपणे पुढे येतो. अस्सल जगण्यासाठीची ही जीवनदृष्टी. त्यामुळेच बहुधा वडिलांच्या मृत्यूनंतरच्या काळात ‘निसटावंसं’ वाटत असतानाही खंडेराव सर्व रीती, विधी, व्यवहार यांना मख्खपणे सामोरा जातो.
-५-
अस्सल शोधण्यासाठी सारं काही सहन करण्याचा हा मख्खपणा खंडेराव, तुमच्यात कुठून आला?
खंडेराव गावात जे जगला, जे संचित गावातल्या कुचाळक्यांमधून आणि कुटुंबातल्या कहाण्यांमधून त्याच्यापर्यंत पोचलं त्यातून खंडेराव घडला आहे. त्यामुळे हे सगळं त्याच्या भौतिक आणि सांस्कृतिक परिसरातून त्याला मिळालं आहे. त्या परिसराचं नाव आहे ‘हिंदू’ परिसर. या नावाबद्दल खुलासा करून मग पुढे जायला हवं. कारण मुळात नेमाड्यांनी हा सगळा आराखडा मनाशी करून त्याला ‘हिंदू’ हे नाव मुक्रर केलं. त्यानंतर ‘हिंदू’ या कोटीचा सार्वजनिक जीवनातला संदर्भच बदलून गेला. तरीही आपल्या निर्णयाशी- या परिसराला हिंदू म्हणण्याविषयी- नेमाडे ठाम राहिले. यात अर्थातच धोका होता/ आहे. भलत्याच ‘हिंदू’शी नेमाड्यांची ‘हिंदू’ ही कोटी जोडली जायची. नेमाड्यांनाही ताप आणि त्या हिंदूवाल्यांना तर त्याहून ताप.
तर, ‘हिंदू’ या नामचिन्हाला किमान चार संदर्भ गेल्या शतकभरात अस्तित्वात आलेले दिसतात. एक आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘हिंदू’चा. त्याचा किस्सा या कादंबरीत आहेच (३१८-३३१). दुसरा सावरकरी हिंदुत्वाचा. त्याची आणि संघाच्या हिंदुत्वाची कादंबरीत जरा सरमिसळ झाली आहे हा भाग अलाहिदा. पण एके काळी या दोन हिंदुत्वांमधून विस्तव जात नसे. या दोहोंबद्दल खंडेरावाची वृत्ती तिखट नकाराची आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘हिंदूं’शी खंडेरावाच्या परिसराचा संबंध आहे तो निव्वळ अपघाती नामसाधर्म्याचा. खंडेराव म्हणतो, ‘... विशाल राष्ट्रीयतेच्या ध्वजाखाली पंचमवर्णीयांची विष्ठा असते...’ (३२०). हे जर ‘त्या’ हिंदूंनी वाचलं तर न जाणो किती शहरांमध्ये नेमाड्यांना पोलिस संरक्षण द्यावं लागेल!
तिसरं ‘हिंदु’पण महात्मा गांधींचं. नवल म्हणजे या कादंबरीत तेही जवळपास अदृश्य आहे. म्हणजे संघाच्या निमित्ताने येतो एखादा उल्लेख तेवढाच. आणि एका बेहद्द कॉमेडी परिच्छेदात सामान्यांचे बापूजी भेटतात- मुन्नाभाईची खानदेशी आवृत्ती (३२९) जणू! हे मोरगावच्या भपाऱ्या पाटलाला उमगलेले गांधी : ‘गांधीजी म्हंता, ... (जिनांना) तूच मुख्य हो सबंध हिंदुस्थानचा.. अरे, भावाभावांचं वैर फार वाईट... भांड्याले भांडं लागतंच... हात जोडतो भौ जिना. तू मोठ्या बापाचा, आम्ही लहान बापाचे! मंग बी झालं?’ पण हे एवढंच. खंडेरावाला आपलं ‘हिंदू’ नामचिन्ह गांधींशी फार जोडावंसं वाटत नाही. चौथं हिंदुपण आहे जे कादंबरीत भरून राहिलं आहे.
जगण्याची समृद्ध अडगळगांधींना पारंपरिक आणि परंपरावादी मानलं जातं. त्यांच्यात हे चौथं हिंदुपण होतंही. पण त्यांना ‘अडगळ’ आवरण्याची थोडी सवय होती. परंपरेनं नशिबी आलेल्या अडगळीतून निवड करून पुढे जाण्याची त्यांची लकब होती. खंडेरावाच्या उग्र पारंपरिकतेत कदाचित ते बसत नसेल. तेव्हा जास्त व्यापक आणि सामान्य अर्थाने प्रचलित एका भू-सांस्कृतिक परिसराला इथे हिंदू म्हटलं आहे.
खंडेराव वावरतो तो या हिंदू परिसरात. त्याच्या अनुभव-विश्वा तला स्थितिवाद- आहे तसं जगण्याचा आग्रह या हिंदुपणातून येतो. खंडेराव ज्या समावेशकतेबद्दल बोलतो तीही याच हिंदुपणातून येते. खंडेरावाला ज्या मांगल्याचा शोध घ्यायचा आहे त्या मांगल्याच्या क्षमताही त्याला हिंदू परिसरात कधी कुठे दिसतात. प्रश्न राहतो एवढाच, की (इतरत्रही असू शकतील तशा) हिंदुपणात(सुद्धा) मांगल्याच्या क्षमता आहेत असं ही कादंबरी म्हणते, की (फक्त) हिंदुपणातच त्या क्षमता आहेत, असा अनन्यभावी किंवा एकमेवाद्वितीयवादी कडवा आग्रह ती धरते? उत्तर अवघड आहे. ‘हिंदू-’ कादंबरीत असा अनन्यभावी आग्रह नाही, असा विश्वास ठेवायला मला आवडेल. पण उत्क्रांतिवादाला मुख्यत: पश्चिीमेकडचे देश कारणीभूत आहेत, असं कादंबरीत सूचित केलं आहे, त्याअर्थी नेमाड्यांना तिथल्या सांस्कृतिक परिसरांविषयी कमी आस्था आणि अपेक्षा असाव्यात अशी शंका येते. ही अस्वस्थ करणारी शंका आहे. कारण सांस्कृतिक परिसरांमध्ये अशी प्रतवारी करणं आत्ममग्नतेला, आत्मप्रौढीला आणि सामुदायिक अहंकाराला खतपाणी घालतं. गांधींच्या हिंदुपणात अशी स्व-परता नाही. आपली संस्कृती तेवढी श्रेष्ठ, असं मानण्याची वृत्ती आपल्या समाजात आहेच. तीच जर या कादंबरीतून अभिव्यक्त होत असेल तर खंडेरावाला शक्यतांच्या रानात सापडलेला पावलाचा एकमात्र ठसासुद्धा (५४९) फसवा ठरला असं म्हणावं लागेल.
नेमाड्यांच्या हिंदुपणाबद्दलची आणखी एक अस्वस्थ करणारी पण आकर्षक वाटणारी गोष्ट म्हणजे तिचं (समृद्ध) अडगळ हे वर्णन. आकर्षक, कारण आपल्या सांस्कृतिक भूत आणि वर्तमानाच्या हिश्शाला अडगळ या कोटीत टाकण्याचं दाखवलेलं धाडस. हे काही राजकीय धाडस नाही, तर आपल्या प्रेयसालासुद्धा तटस्थपणे अडगळ म्हणण्याचं हे धाडस आहे. अस्वस्थता अशासाठी, की लेखक या अडगळीचं तर्कशास्त्र पुरेसं पुढं नेत नाही. खंडेरावाचं आयुष्य- त्याच्या गावकऱ्यांचं, सवंगड्यांचं, नातलगांचं आयुष्य-गतस्मृती, या सगळ्यांमध्ये समृद्धीची (समाधानाची) आणि समर्थनाची दाट छाया आहे. कुठलाच सांस्कृतिक परिसर सहजासहजी मेद झाडून टाकत नाही. त्याला हिंदू सांस्कृतिक परिसरही अपवाद नाही. म्हणून अडगळ साचत जाते. अडगळीचंच रूपक पुढे चालवायचं, तर एके काळी कामाच्या वस्तू पुढे अडगळ बनतात. आणि जर मोठ्या वाड्यात अडगळ साचली तर फारसं बिघडत नाही, पण ‘अस्सल’ बाजूला पडायला वेळ लागत नाही. अशा वेळी गरज असते ती अडगळ धांडोळून अधूनमधून भंगारार्पण करण्याची. हेच नेमकं खंडेराव करीत नाही. तो घुसमटतो, चरफडतो, चेमटून जातो; पण अडगळीला हात काही लावत नाही.
हिंदू सांस्कृतिक परिसराच्या श्रेष्ठत्वाचं सूचन हे जर नेमाड्यांचं या कादंबरीतलं एक कथन असेल, तर त्या परिसराच्या चिकित्सेतली हयगय हे त्यांचं दुसरं कथन म्हणावं लागेल. ती चिकित्सा त्यांनी सुरू करून दिली असती तर त्यांना अभिप्रेत असलेल्या अस्सलपणाच्या शोधाची चर्चा मराठीत नव्या दमाने सुरू झाली असती. ते काही होत नाही. खंडेराव, जरा अडगळ आवरत जा, राव!
सुहास पळशीकर
बी-७०३, रोहन गरिमा,
गोखलेनगर, पुणे - ७.
फोन: ०२०-२५६३६९९५

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव! -- सुहास पळशीकर (Page 3)

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली बहुचर्चित कादंबरी. खंडेराव हा या कादंबरीचा नायक. या नायकाच्या आत्मसंवादातून लेखकाने भूत आणि वर्तमानातील माणसाच्या जगण्याचा मोठा पट मांडला आहे. मोठा आवाका असलेली अशी कादंबरी मराठीत दुर्मिळच. साहजिकच कौतुक, वाद, टीका असं सारं काही या कादंबरीच्या बाबतीत होत आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलेली या कादंबरीची चिकित्सा.
-३-
पण त्याआधी गाव आणि कृषिसंस्कृती यांचं समर्थन केल्यामुळे खंडेरावाच्या समाजशास्त्रीय आकलनाला मिळणाऱ्या आणखी एका कलाटणीची नोंद घ्यायला हवी. गाव म्हटलं की गावगाडा आलाच. पाचपंचवीस जातीही आल्याच. त्यांच्याबद्दल ‘हिंदू-’ काय म्हणते? खंडेरावाच्या या गावाचा सामाजिक परिसर कुणबीप्रधान आहे, कारण तो शेतीसमाजाबद्दल सांगतोय. आता, शेतकऱ्यांना ‘कुणबी’ असं आवर्जून म्हणणं ही अर्थातच काळजीपूर्वक केलेली निवड आहे. काही शिक्षित अज्ञजन म्हणतील, की हे मराठे आहेत. किंवा खानदेशातल्या एका जातीचं ‘कुणबी’शी साधर्म्य आहे, असंही म्हणता येईल. पण ‘कुणबी’ या नामचिन्हातून वर म्हटल्याप्रमाणे गरीब शेतकरी सूचित होतो. जमीनदार ते वेगळे. शेतकरी आपला कुणबीच, आणि म्हणून तो गावाशी, गावाच्या समाजव्यवस्थेशी एका बरोबरीच्या नात्याने जोडला जातो, जोडलेला असतो, असं कुणबी या नामचिन्हातून सूचित होतं. जणू खंडेराव म्हणतोय, की मराठा, मराठा वर्चस्व ही सगळी वसाहतकाळातील व वसाहतोत्तर काळातील रचिते आहेत. प्रत्यक्षात ग्रामीण, शेतीप्रधान समाजात सर्वच जाती शेतीच्या अर्थव्यवस्थेने घट्ट जोडलेल्या होत्या, आणि त्यात थोडं वर-खाली असलं तरी गावात मराठे कुठे असतात, तिथे तर सगळे शेतकरी कुणबीच असतात- हा सगळा युक्तिवाद कुणबी या नामचिन्हाच्या निवडीत अभिप्रेत आहे. खंडेराव, मोरगावातल्या मराठा महासंघात सामील व्हा राव! नाही तर कुणबी सेना?
हा प्रश्न फक्त ‘कुणबी’ या नामाभिधानाचा नाही. त्या कुणबी वास्तवाच्या वर्णनाचा-आकलनाचा आहे. पान १०५ ते १११ या सात पानांमध्ये जातिव्यवस्थेचं नमुनेदार आकलन वाचायला मिळतं. थोडी संपन्नता असेल तिथे कुठून कुठून लोक येऊन कामाला जोडून घेतात, आणि मग तिथली व्यवस्था त्यांना (आपल्या अटींवर) सामावून घेते, हे एक ढोबळ सूत्र पुढे येतं. ‘एकंदरीनं बाहेरून आलेले सगळे गावातल्या समाजात वेगवेगळ्या प्रकारे सामावून घेतले गेले... सगळ्या प्रकारचे संबंध ठेवून तरी एक समाज म्हणून राहणारी ही जातिव्यवस्था. रंगीबेरंगी फुलासारखे पाकळ्यांवर जिथे जागा सापडेल तिथे आपलं स्वतंत्र अस्तित्व सांभाळत एकमेकांना राखणारे आंतरसमूह. डौलानं पिढ्यांमागून पिढ्या हे लोक एकोप्यानं राहत आले.’ (११०) पुढे खंडेराव सांगतो- ‘सामावून घेण्याचा नेहमी एकच प्रकार असतो : पोटं भरा, तुमचं तुम्ही नीट राहा झालं.’
हा संपूर्ण उतारा म्हणजे एकांगी वर्णन, अर्ध्यामुर्ध्या ऐतिहासिक प्रक्रियांचा आधार आणि एक विशिष्ट मूल्यदृष्टी यांचं बेमालूम मिश्रण आहे. खंडेरावाला असणारं परिस्थितीचं आकलन म्हणून हे वर्णन यथातथ्यच आहे. बऱ्या पैकी संपन्न कुणबी घरातल्या तरुणाला ही सांस्कृतिक सरमिसळ आणि आर्थिक परस्परावलंबित्व या पुरेशा गोष्टी वाटू शकतात. पण आपला खंडेराव या कुणबी दृष्टीपासून बाजूला सरकून हे सगळं तपासून पाहू शकेल का?
एक तर यात कुणबी (आता काही बलुतेदार जाती) या स्थानिक, तर बाकीचे बाहेरून आलेले मानले आहेत. म्हणजे कृषिसंस्कृतीने आपल्याकडे आकर्षून घेतलेले अकृषी (भटके) समाज. पण तसं म्हटल्यानं त्यांना पूर्वी- गावात येण्यापूर्वी- जात नव्हती, उत्क्रांत कृषिसंस्कृतीने त्यांना जात बहाल केली, असं आपल्याला समजतं (अर्थातच प्रगतीमुळे जाती आल्या). पण मग गावातल्या कुणबी, सुतार, शिंपी, लोहार, महार, मांग, चांभार यांचं काय? आणि मग गावात ‘तरीही’ ‘एक समाज’ होतो तो कशामुळे? होतो का? खंडेराव म्हणतो, की अंतर ठेवून, विरोध ठेवून जातिव्यवस्था एक समाज म्हणून राहते. इतकंच नाही, तर त्या जातींचं मिळून रंगीबेरंगी फूल तयार होतं. अरेरे! खंडेराव, तुम्ही पुरातत्त्वाचे संशोधक. मढी-मडक्यांचं म्युझियम करू नये, हे तर पुरातत्त्वात तुम्ही शिकलाच असाल की राव! मग संघर्ष आणि स्पर्धेच्या कर्दमात रुतलेल्या जातिव्यवस्थेचं तुम्हाला रमणीय फूल दिसायला लागावं? जातिव्यवस्थेचं असं आदर्श रमणीयीकरण करत पुढे खंडेराव भलताच भारावून जातो- डौलानं.... एकोप्यानं राहत आले. कृषिव्यवस्थेतल्या अवलंबनाला एकोपा म्हणायचं तर म्हण बाबा, पण डौल? ‘तुमचं तुम्ही’ नीट राहण्यातला डौल? पुढे एका ठिकाणी (२००) हे वाक्य येतं : ‘मेंढपाळ, आदिवासी, भटके, महार-मांग-चांभार ग्रामव्यवस्थेशी फटकून राहिल्यामुळे फटिंग जगतात.’ म्हणजे कुणबीप्रधान, शेतीप्रधान ग्रामव्यवस्थेत सामावून जायचं तर त्या व्यवस्थेच्या अटींवरच की!
पण खंडेराव प्रामाणिक आहे आणि अस्वस्थ आत्मा आहे. तो जातिव्यवस्थेकडे या कुणबीप्रधान दृष्टीने बघत असला तरी त्या व्यवस्थेतून निपजणाऱ्या व्यवहारांमधला दुष्टावा तो नजरेआड करत नाही. उलट, ‘महारा-मांगांना जवळ न करण्याच्या’ प्रमादाबद्दल तो वारकरी संप्रदायाची चोखी संशयास्पद मानतो. एका ठिकाणी तर खंडेराव म्हणतो, ‘हजार- दोन हजार वर्षं समाजाच्या परिघावर घोटाळणार्यार किती तरी लोकांना आपल्या निर्दय गावगाड्याच्या पलीकडे कुठेही जागा नसावी?’ (३८३). म्हणजे प्रामाणिक संवदेनाशीलता, पण मूळ आकलनदृष्टीतच गफलत. इथेही पाहा: गावगाडा निदर्य खरा, पण इतर कुठेही ज्यांना जागा मिळत नाही त्यांना गावगाड्यात जागा आहे, असंच तो म्हणतोय.
‘डौलदार एकोपा’ हा खरं तर एकतर्फी एकोपा आहे याचं खंडेरावाला भान आहे. तो स्वत:लाच प्रश्न करतो, ‘हा एकतर्फी एकोपा हजारो वर्षांनंतर आमच्या डोळ्यांसमोर तुटला. आवळ्यांची मोट सुटली. कशामुळे?’ (१११)
‘मोडताही येत नाही म्हणून उभयपक्षी चालूच राहणारी- हा कोणत्या नामुष्कीवाण्या गुलामगिरीचा प्रकार आहे?’
‘पण हे मोडलं. ग्रामव्यवस्थेचा हजार वर्षं कोंडलेला श्वास मोकळा झाला...’ (१६७). हे कसं झालं?
खंडेरावाच्या मते महारांनी गावकीचे धंदे सोडले, हिंदू धर्म सोडला आणि आवळ्यांची मोट सुटली.
हिंदू धर्म सोडण्याचा हा क्षण कादंबरीत येतो तो मुख्यत: सवर्णांच्या आणि त्यातही कुणब्यांच्या दृष्टीतून. त्यामुळे त्याविषयीच्या आशंका, कुशंका या स्वाभाविक आहेत. मग गफलत काय आहे?
ती तीन पातळ्यांवर आहे. एक तर गावकी सोडल्याने नक्की काय फरक पडला याबद्दलची संदिग्धता कादंबरीच्या त्या भागात भरून राहिली आहे (१४९ ते १६७). पूर्वाश्रमीच्या महारांच्या वस्तीत बऱ्याच वर्षांनंतर खंडेराव जातो तेव्हा त्याला वारंवार समोर दिसणारं पोस्टर जणू त्याचा प्रश्न मुखर करतं. मुक्त कोणी कोणास केलं? खंडेरावजवळ या प्रश्नाचं उत्तर नाही, ही एक प्राथमिक गफलत. कारण त्यात कोणाला मुक्तीची निकड आहे/ होती याबद्दलचा बेहद्द ‘परातात्त्विक’ गोंधळ दिसतो. (पुरातत्त्वाचं संशोधन ते दुय्यम आहे. परातत्त्वाचा स्पर्श तो मुख्य - ५३३). दुसरी त्याच्याशी संलग्न गफलत म्हणजे महारादी जातींची गुलामी आणि अप्रतिष्ठा आणि इतर समूहांचे जीवनविषयक प्रश्न यांची खंडेराव कुणबीकेंद्री गल्लत करतो. ‘शेतकरी कुणब्यांना कष्ट करूनही सुरक्षितता आहे? आत्मप्रतिष्ठा आहे? बलुत्यांना तरी कुठे आत्मप्रतिष्ठा आहे?’ असे प्रश्न विचारून (१६७) खंडेराव आत्मप्रतिष्ठेचा प्रश्न सार्वत्रिक करून टाकतो. त्यामुळे जातिव्यवस्थागत कनिष्ठ जातींच्या आत्मप्रतिष्ठेचा प्रश्न दुय्यम बनतो. तरीही अर्थात, खंडेरावाला या आत्मप्रतिष्ठेच्या प्रकल्पाबद्दल एक दूरस्थ आपुलकी आहे. थोडाफार पुढारी झालेला आणि आता बौद्ध झालेला हरचंद खंडेरावाला भेटतो तेव्हा त्याच्या (हरचंदच्या) कोट-टोपी-घड्याळाची असूया न वाटता खंडेरावाला एक तटस्थ कौतुक वाटतं. ‘एकदम छान, नवं काही तरी’ जाणवतं. ते म्हणजे हरचंदचा आत्मविश्वा स. हे स्थित्यंतर कादंबरीत अत्यंत समर्थपणे टिपलं आहे. आणि तरीही तिसरी गफलत उरतेच. तीच तर पायाभूत गफलत आहे.

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव! -- सुहास पळशीकर (Page 2)

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली बहुचर्चित कादंबरी. खंडेराव हा या कादंबरीचा नायक. या नायकाच्या आत्मसंवादातून लेखकाने भूत आणि वर्तमानातील माणसाच्या जगण्याचा मोठा पट मांडला आहे. मोठा आवाका असलेली अशी कादंबरी मराठीत दुर्मिळच. साहजिकच कौतुक, वाद, टीका असं सारं काही या कादंबरीच्या बाबतीत होत आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलेली या कादंबरीची चिकित्सा.
-२-
आणि तरीही आपल्याला माहिती आहे, की नेमाडे यांचा वैचारिक प्रकल्प जास्त गंभीर आणि गुंतागुंतीचा आहे. गाव आणि शहर या द्वैतामधलं गाव हे ‘कृषिसंस्कृती’चं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे खंडेरावाच्या गोष्टीत शेती, शेतीचं अर्थशास्त्र, शेतकरी समाज यांची चर्चा पुन्हा पुन्हा येते. शेतकरी हा या सगळ्या व्यवहारांचा केंद्रबिंदू. इथेही एक भानगड येतेच. ती म्हणजे कृषिकेंद्रित उत्पादन व्यवहारांच्या पलीकडचे (औद्योगिक) उत्पादन व्यवहार हे उपरे, बांडगुळी आणि शोषक व्यवहार आहेत, असं एक अस्फुट चित्र खंडेरावाच्या कथनाच्या पाठीमागे असल्यासारखं वाटतं. मात्र त्याची चर्चा नाही किंवा ते चित्र पुरेसं ठळकपणे रंगवण्याचा प्रयत्नही ही कादंबरी करीत नाही. मात्र ‘शेती’च्या विश्वामागचा वेध घेण्याचा प्रयत्न ती जरूर करते. या प्रयत्नाचा केंद्रबिंदू आहे खुद्द खंडेरावाचं कुटुंब. पण एकूण गावाची ओळख खंडेराव कशी करून देतो?
एक तर शेती करणारे हे कुणबी असतात, असं तो आपल्याला सांगतो. (म्हणजे पुन्हा जातीचा मुद्दा आला. शेतक-यांना ‘मराठा’ म्हणायचं की नाही? पण ही भानगड आपण जातीच्या मुद्द्याबरोबर निस्तरू.) कधी त्यांचा उल्लेख ‘खाऊन-पिऊन सुखी गरीब कुणबी’ (२०१) असा येतो, तर कधी ‘दरिद्री कुणबी’ (२०५) असा येतो. इतर वेळेला संवेदना आणि सांस्कृतिकता यांच्या अक्षांवर समाजजीवन तपासणाऱ्या खंडेरावाला मोरगावच्या शेतीसमाजाची चर्चा करताना मात्र ‘समाजशास्त्रीय’ व्हावं लागतं. पान १८७ ते २०५ च्या दरम्यान खंडेराव काय सांगतो ते पाहण्यासारखं आहे. निसर्गाच्या लहरीपणातून शेतकऱ्यामध्ये आलेली निर्विकार स्थितप्रज्ञता तो आपल्यापर्यंत पोचवतो: ‘या सगळ्यापायी थकून पाय लांब करून झोपी जाताना कुणबी काही राग-द्वेष न करता म्हणणार, चालायचंच गड्याहो, कव्हा गाड्यावर नाव, कव्हा नावेवर गाडं, चालूच आये... देवा, तूच एक आहे.’ (१८८) दुसरी गोष्ट सहज येऊन जाते ती शेतीच्या व्यवहारांची आणि निर्णयांची सामूहिकता. रात्री गल्लीगल्लीत सुख-दु:ख आणि अध्यात्म यांच्याबरोबरच शेतीच्या कामांची कशी चर्चा होते याची वर्णनं येतात (१९७). यातून मनावर ठसते ती कुणबी शेतकरी कुटुंबांच्या जीवनातील सामुदायिकता आणि देवाणघेवाण. इथे खासगी काही ते उरतच नाही. जो काही मनात सल असेल त्याचा जाहीर उच्चार आणि शेतीतल्या प्रश्नांवर जाहीर सल्ला. समुदाय जीवनाचं हे चित्र नक्कीच वास्तवाला धरून असं आहे. (पण हे समुदायविश्व् ‘कुणब्यां’चं आहे का सार्यां गावाचं, हा प्रश्न मानगुटीवर बसल्यावाचून राहत नाही.)
आणि पुन्हा हे सगळे कुणबी शेतकरी ‘गरीब अल्प भूधारक’ आहेत, हेही खंडेराव सांगतो. गावातले नव्याण्णव टक्के शेतकरी असेच दोन-चार बिघे जमीनवाले (२००). ‘या अल्प भूधारक गरीब शेतकर्यां च्या जराशा वरच्या सांपत्तिक पातळीवर जगणारे, स्वत:ला वजनदार शेतकरी म्हणवून घेणारे’ गावात दहा-पंधरा होते. आपल्याला वाटतं, की आता खंडेराव या ‘शेतकरी समुदाया’तल्या अंतर्गत द्वंद्वाबद्दल आपल्याला सांगणार. पण कसचं काय! ‘यांची स्थिती म्हणजे जास्त ओझं वाहणाऱ्या बैलांसारखी,’ असं सांगून तो चक्क ते द्वंद्व नाकारतो (२०२). अर्थात कृषिसंस्कृतीच्या अस्तित्वाचं आणि यशाचं श्रेय तो स्त्रीश्रमाच्या ‘आदिम नारीनृत्याला’ देतो- ते वर्णन हलवून टाकणारं आहे. पण ही धारदार संवेदना आणि चिकित्सावृत्तीची कु-हाड तो ‘शेतकरी समुदाय’ नावाच्या वास्तव-कल्पितावर का चालवत नाही, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
तरीही एकांगीपणाचा आरोप खंडेरावावर करता येत नाही. उलट, इथे एक वेगळाच गुंता आपल्यापुढे येऊन उभा ठाकतो. खंडेरावाच्या कळत्या आयुष्याचा मोठा भाग हा त्या शेतीच्या रगाड्यापासून अलिप्त राहण्यात आणि दूर पळण्यात व्यतीत झाला आहे. म्हणजे कृषिसंस्कृती, शेतकरी समुदाय आणि शेती व्यवहारांची रमणीय गुंतागुंत यातूनही काही तरी टोचणारं असं शिल्लक आहे. ते कादंबरीत पुरेसं व्यक्त होत नाही. खंडेरावाला आपलं कुटुंब, त्याचा शेतीचा बारदाना यांच्याबद्दल एक अढी आहे ती या शेतीव्यवस्थेबद्दल आहे, तिच्या सांप्रत स्वरूपाबद्दल आहे की व्यक्तीला पुसून टाकण्याच्या तिच्या सामुदायिकतेबद्दल आहे? भावाच्या मृत्यूनंतर आतपासून हलून गेलेल्या खंडेरावाला त्या अवस्थेतही आता आपणच एक सुपुत्र उरलो, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. आपल्या संपन्न शेतकरी कुटुंबाच्या सर्व गिळंकृत करणाऱ्या सामुदायिकतेपासून दूर पळण्यासाठी खंडेरावाला भावडूची ढाल होती. हा त्याचा भाऊ दोघा भावांच्या वतीने शेतीच्या सामुदायिकपणाच्या बकासुराचा स्वेच्छाबळी बनला होता. आता खंडेरावाचा नंबर.
वडिलांच्या मृत्यूने खंडेरावाच्या व्यक्तित्वाभोवतीचे ‘शेतकी व्यवस्थे’चे फास आणखी आवळले जातात. बहुधा त्या चिंतादग्ध अवस्थेत खंडेरावाला लक्षात येतं, की आपण नेमक्या याच ‘कुणबी कृषिसंस्कृती’पासून तर आतापर्यंत दूर पळत राहिलो. ‘...क्रूर मार्गांनी कुणबी संस्कृती... अहिंसेचं मृगजळ पाजत आली आहे...’ (४००-४०१) असं तो उद्वेगाने म्हणतो. ‘शेतीमुळे ह्या लोकांच्या सगळ्या सौंदर्यभावना नष्ट झालेल्या आहेत. नाचणं, गाणं तर नाहीच. केवळ स्वार्थापलीकडे ग्रामीण कृषिसंस्कृतीत काही उरलेलं नाही. खंडेराव, सगळा चोथा.’ (४०२).
म्हणजे खंडेरावाचं हृदय परिवर्तन झालं की काय? का खंडेरावानं कृषिसंस्कृतीतून पक्षांतर केलं? तर सावधान! पुढचाच परिच्छेद पाहा. त्यात थेट शारीरिक श्रम आणि बौद्धिक काम यांच्यातला झगडा दाखवला आहे. ‘स्वत:च्या मेहनतीनं कापूस उत्पादन करणाऱ्यांपेक्षा फॅशनेबल धंदे करणारे शहरी पांढरपेशे अधिक सुंदर कपडे वापरतात...’ ‘हा पांढरी-काळीचा झगडा सहा हजार वर्षांपासून चालू आहे...’ वगैरे सांगत खंडेराव थेट न्यूयॉर्क महानगर जमिनीखाली केव्हा जाईल, असा सत्त्वसंतप्त सवाल उभा करून आपल्याला गारद करून टाकतो.
म्हणजे कुणबी कृषिसंस्कृतीवरची टीका ही तिच्या स्वभावस्थ वैशिष्ट्यांमुळे नसून, ती वैशिष्ट्यं टाकून देऊन फक्त ‘चोथा’ शिल्लक राहिल्याबद्दल आहे. कुणबी कृषिसंस्कृतीचं खंडेरावाच्या दृष्टीनं गाभ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेवढ्यास तेवढं पिकवून पोट भरणं. पण हरितक्रांतीनं घात केला. ‘नगदी पिकं पेरून विहिरी उपसण्याचा चंग शेतकऱ्यांनी बांधला.’ (ज्या थोड्यांकडे पाणी/विहिरी आधीच होत्या त्यांची बरोबरी कशाला? काही थोडे राहिले वजनदार तर बिघडलं कुठे? देवा, तू एकच!) ‘गावाबाहेरचं गाव गाव चौपट झालं.’ ‘दुसऱ्या कोरडवाहू गावांमध्ये चार-पाच रुपये रोज तर इथे दहा रुपये- तेही नगद...’ (फालतूचीच कमाई म्हणायची की खंडेराव!) ‘बैलांची शेती जुनाट होत चालली. ट्रॅक्टर, चक्क्या, मळणीची यंत्रं येत गेली.’ (तेवढेच बायाबापड्यांचे अवाढव्य श्रम जरा कमी झाले असतीलच की!) या सर्व विधानांमागे एक अध्याहृत विधान आहे- की समाज बिघडायला लागला. पण मग त्या प्रत्येक विधानावर कंसात (प्रस्तुत लेखकाने) केलेलं भाष्य शिल्लक राहतंच. खंडेराव, तू फक्त गोष्टच सांगत जा राव! पण ऐकेल तर तो खंडेराव कसला? उलट, खंडेरावाला आमच्यासारख्या बिगरकृषिसंस्कृतीवाल्यांचे आक्षेप जणू आधीपासूनच माहिती असणार. त्यांची विल्हेवाट तो पुढच्याच वाक्यात कशी लावतो पाहा : ‘बारमाहू काबाडकष्टू कोरडवाहू फाटकूतुटकू शेणखतू मरूमरू टुकूझुकू शेती कालबाह्य होत चालली. शेतकऱ्यांची संपन्नता वाढली.
आता या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा? नुसतं वर्णन? की पक्षपाती निवेदन? खंडेरावाची गोष्ट काय सांगते पाहा: एक गणू गोंधळ्याचं पडकं घर फक्त पूर्वीसारखंच गात राह्यलं :
कोळी कोष्ट्यानं वो घर बांधिलं सुख भोगण्याला होऽ होऽ
सुख भोगण्याला न् आतमध्ये घुसूनच मेला होऽऽ...
पुरातत्त्ववेत्ते खंडेराव यांचं निदान? समाजशास्त्री खंडेरावांची भविष्यवाणी? ऋषीवर खंडेरावांची शापवाणी?
बरं, हरितक्रांती म्हटलं तर भांडवली विकासाचाच एक भाग होती. तिची चिकित्सा, चिरफाड, ताळेबंदाची झाडाझडती व्हायला हवीच. पण हरितक्रांतीपूर्वी काय कृषिसंस्कृती होती? मुळात समाज स्थिरावस्थेत समाधिस्थ नसतात, हे पुरातत्त्व संशोधक खंडेरावाला सांगायला नकोच. पण जर एक-एक पाऊल मागे जाऊन पुढे झालेल्या प्रगतीचा पर्दाफाश करू म्हटलं, तर भांडवली हरितक्रांतीपूर्वी सरंजामी व्यवस्था या ना त्या स्वरूपात असणार. ती भांडवली हरितक्रांतीपेक्षा परवडली, असं म्हणणं (आपल्याला) अवघड जातं. खरं तर तसं म्हणणं खंडेरावालाही अवघडच. पण तो बहाद्दर अशा वेळी आपल्यामधल्या समाजशास्त्राला पायजम्याच्या खिशात दाबून ठेवून एका भूतकालीन कल्पितादर्शाशी वर्तमान अधिक-उण्याची तुलना करतो.
तरीही खंडेरावाविषयीचं आपलं आकर्षण सरत नाही. कारण तिरीमिरी आल्यावर तो हिंस्रपणे सांगून टाकतो, की ‘रेड्यांना नुस्तं ताक पाजत पाजत शेवटी मारून टाकायचं, हा कृषिसंस्कृतीतला अलिखित अहिंसक कायदा’ (४००). त्याच्या या हिंस्र प्रामाणिकपणाचं कारण आपण पुढे पाहणार आहोत त्याप्रमाणे हेच, की शेवटी कृषिसंस्कृती हासुद्धा ‘उत्क्रांती’मधला एक टप्पा आहे. खंडेरावाचं उग्र भांडण त्या उत्क्रांतीशीच तर आहे!

Friday, 3 March 2017

रघुराम राजन : व्यवस्थेला न परवडणारा विचारवंत --अभय टिळक

रघुराम राजन : व्यवस्थेला न परवडणारा विचारवंत
दिवाळी २०१६ - व्यक्तिचित्रे 
अभय टिळक
  • रघुराम राजन यांची एक मुद्रा
  • Wed , 26 October 2016
वडिलांचा वारसा या ना त्या स्वरूपात मुलाकडे येत असतोच, परंतु व्यवस्थानामक पोलादी चौकटीशी सूत न जुळण्याचं बापाचं भागधेय मुलाच्याही वाट्याला येण्याचे अनुभव व्यवहारात तसे अपवादानंच येतात. आर. गोविंदराजन आणि रघुराम राजन या पितापुत्रांची गणना अशा दुर्मीळांतच करावी लागेल. आर. गोविंदराजन म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३वे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे तीर्थरूप. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून राजन यांची कारकिर्द लक्षणीय ठरलीच, परंतु त्याहीपेक्षा बहुचर्चित ठरला तो त्यांनी त्या पदाला केलेला अलविदा. गोविंदराजन यांच्याबाबतीत जवळपास तसंच काहीसं घडलं होतं. किंबहुना म्हणूनच, राजन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाल्याचं वृत्त समजताच गोविंदराजन यांच्या मुखातून भविष्यसूचक असे उदगार बाहेर पडले. ‘रघु कर्तृत्त्ववान आहे यात वादच नाही, परंतु त्याला मिळालेलं पद म्हणजे आगीशी खेळ आहे. तो खंबीर आहे आणि कोणताही प्रसंग तो निभावून नेईल, पण अनपेक्षितपणे हवेत जितकं उंच उचललं जावं तितक्याच अचानकपणे जमिनीवर आदळणं मग आपसूकच भाळी येत असतं,’ अशा आशयाचे उदगार गोविंदराजन यांनी त्या वेळी काढले होते.
त्याला कारणही तसंच असावं, कारण ‘रॉ’सारख्या (रीसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनलिसिस विंग) आपल्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेतील एका अग्रगण्य संस्थेचं धुरीणपद हातातोंडाशी येऊनही केवळ व्यवस्थेतील उच्चपदस्थांच्या गैरमर्जीपायी त्या पदाला मुकावं लागण्याच्या प्रसंगाला गोविंदराजन यांनाही त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या अंतिम पर्वात सामोरं जावं लागलं होतं. भारतीय पोलीस सेवा परीक्षेत १९५३ साली देशभरात पहिला क्रमांक पटकावून देशाच्या पोलीस सेवेत दाखल झालेले गोविंदराजन पुढे लौकरच त्या सेवेचा निरोप घेऊन गुप्तचर विभागात प्रवेशते झाले. १९६८ साली गुप्तचर विभागातून रॉ हा विभाग वेगळा केला गेल्यानंतर रॉचे सर्वेसर्वा गणले जाणारे आर. एन. राव यांचे विश्वासू उजवे हात या नात्यानं गोवंदराजन रॉच्या सचिवपदापर्यंत चढत गेले. रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती केली जाण्याची सर्वांनाच अपेक्षा असताना, १९८७ साली, गोविंदराजन यांना अनपेक्षतरीत्या डावललं गेलं. त्या सगळ्या उलटापालटीला कारण ठरलं ते महावादग्रस्त असं बोफोर्स प्रकरण. त्या वेळी पंतप्रधान होते राजीव गांधी. गोविंदराजन यांना नेमकं कशामुळे डावललं गेलं हे आजवर गूढच आहे. खुद्द गोविंदराजन त्या सगळ्या भूतकाळाबद्दल बोलण्यास नाखूषच असतात. बोफोर्स तोफांच्या खरेदी प्रकरणात पैशांचं हस्तांतरण झाल्याच्या स्वीडिश आकाशवाणीवरून प्रसृत झालेल्या वृत्ताचं प्रक्षेपण भारतीय आकाशवाणीवरून केलं जाऊ नये याची खबरदारी घेण्यात गोविंदराजन कमी पडले आणि त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान त्यांच्यावर खप्पा झाले, असा एक प्रवाद आहे; तर, दुसऱ्या वदंतेनुसार, स्वीडिश आकाशवाणीवरून असं काही वृत्त प्रसृत झाल्याबाबत गोविंदराजन हे पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं पंतप्रधानांच्या ध्यानात आल्यानं त्या नाराजीचा फटका गोविंदराजन यांना बसला.
असं सांगितलं जातं की, स्वीडिश आकाशवाणीनं ते वृत्त प्रसारित केलं, त्या वेळी गोविंदराजन कार्यालयीन कामकाजासाठी परदेशी गेले होते आणि त्या बातमीबाबत विचारणा करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पाचारण केलं, त्यावेळी ते नुकतेच मायदेशी परतलेले होते. कारण काहीही असो, रॉच्या प्रमुखपदावरील हक्क डावलला गेल्यानंतर त्याविरुद्ध लवादाकडे दाद मागण्याच्या मन:स्थितीत गोविंदराजन काही काळ होते; परंतु, अन्य सहकाऱ्यांच्या सल्ल्यावरून पुढे त्यांनी तो विचार सोडून दला, असंही नमूद केलं जातं.
रघुराम राजन रिझर्व्ह बँकेतील कार्यालयात, पाठीमागे बँकेच्या माजी गव्हर्नरांची छायाचित्रं
व्यवस्थेशी सूत न जुळण्याची वडिलांची तीच परंपरा राजन यांच्याकडूनही जपली गेली. आई-वडिलांच्या कथनानुसार, लहानपणापासूनच रघुराम राजन हे कमालीचे निडर. त्यांच्या आईने कथन केलेली एक आठवण या संदर्भात विलक्षण बोलकी आहे. पंतप्रधानपदावर असताना श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्या वेळी राजन यांचे आई-वडील दोघेही ब्रिटनमध्ये होते. नवी दिल्ली येथील त्यांच्या घरी राजन आणि त्यांचा भाऊ असे दोघंच होते. श्रीमती गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे अस्वस्थ झालेल्या राजन यांच्या आईने आपल्या बहिणीला त्या दोन भावांकडे जाण्याबाबत सांगितले. त्या वेळी त्या अशांत परिस्थितीतही आपल्या मावशीला रेल्वेस्टेशनवरून घरी आणायला राजनच गेले. त्या वेळी ते इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होते. मावशीला घरी आणून सोडल्या सोडल्या लगेचच ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या आपल्या हॉस्टेलवर परतले. कारण, हल्लेखोरांचं लक्ष्य झालेल्या शीख बांधवांना हॉस्टेलवर आसरा देण्याच्या कामात ते आणि त्यांचे मित्र त्या वेळी आघाडीवर होते.
अभ्यासात अफाट चमक असली तरी ‘पुस्तकातील किडा’ असा राजन यांचा लौकिक कधीच नव्हता. शाळेत काय वा कॉलेजमध्ये काय ऑल राउंडर म्हणूनच ते ओळखले जात. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे एका ठिकाणी एका शाळेत बिनबोभाट शालेय शिक्षण पूर्ण होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, त्याचा राजन यांच्या अभ्यासावर कधीच परिणाम झाला नाही. त्यांना रस नाही अथवा त्यांनी आपलं कौशल्य अजमावून बघितलं नाही असा बहुधा एकही खेळ नसावा. त्यातल्या त्यात राजन यांचं अधिक प्रेम बसलं ते टेनिस आणि स्क्वॉश या दोन वेगवान खेळांवर. शारीरिक तंदुरुस्तीबद्दलही तितकीच जागरूकता. शिकागो विद्यापीठातील बूथ स्कूलमध्ये फायनान्सचे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतरही स्क्वॉशचा त्यांचा छंद अंमळही ओसरला नाही. वयाच्या पन्नाशीला टेकल्यानंतरही स्क्वॉशच्या मैदानावर उतरलेल्या राजन यांच्याशी मॅच खेळायला ताज्या दमाचे तरुण विद्यार्थीही बिचकायचे, असं राजन यांचे मित्र आजही कौतुकानं सांगतात.
एकंदर चार भावंडांमध्ये राजन हे तिसरे. तीन भाऊ आणि एक बहीण. चारही भावंडं बुद्धिमान. योगायोग म्हणजे, तिन्ही भावांच्या व्यावसायिक कारकिर्दीचा प्रारंभ टाटा उद्योगसमूहातील नोकरीपासून झाला. दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी राजन यांनी सुवर्णपदकासह पदरात पाडून घेतली. पुढे, अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट या संस्थेतून व्यवस्थापनशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही त्यांनी सुवर्णपदक पटकावतच पूर्ण केला. मॅसेच्यूसेट्स् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून बँकिंगच्या क्षेत्रात डॉक्टरेट करून अखेर राजन अॅकेडमिक्समध्ये स्थिरावले. शिकागो विद्यापीठातच त्यांची उमेदवारी सुरू  झाली.
राजन हे नाव खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आलं ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून २००३ सालातील ऑक्टोबर महिन्यात त्यांनी सूत्रं हाती घेतली तेव्हापासून. वयाच्या चाळीशीत प्रवेश करत असतानाच त्यांची त्या पदावर नियुक्ती झाली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून एवढ्या कमी वयात त्या पदावर अन्य कोणाचीही नेमणूक झालेली नव्हती. जगभरातील देशांच्या वित्तीय व्यवस्था, त्यांचं काम, देशोदेशींच्या वित्तीय धोरणनिर्मितीमधील खाचाखोचा, त्यांत अनुस्युत असणारं राजकारण, विकसित देश आणि विकसनशील देशांमधील आर्थिक संबंधांचे बारकावे... अशांसारख्या अनंत बाबींचा अत्यंत जवळून परिचय राजन यांना घडला, तो त्यांच्या त्या तीन वर्षांच्या कारकिर्दीदरम्यान.
२००८ साली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उद्भवलेल्या सघन मंदीनंतर उद्भवलेल्या अरिष्टाचा सामना करतेवेळी त्या सगळ्या अनुभवाची शिदोरी राजन यांच्या कामी आली. केवळ इतकंच नाही तर, आर्थिक मंदीमधून सुटका करून घेण्यासाठी धडपडणारं पाश्चिमात्य जग त्यासाठी अंगीकारत असलेल्या वित्तीय धोरणांपायी विकसनशील देशांच्या आर्थिक हितांची कशी सरसहा पायमल्ली होत आहे, याचं अतिशय नेमकं भान व आकलन राजन वेळोवेळी वैश्विक व्यासपीठांवरून मुखर करत राहिले, ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञाच्या पदावर असताना त्यांनी कमावलेल्या अंतर्दृष्टीमुळेच. जगात उद्भवलेल्या आर्थिक पेचप्रसंगांबाबत कसलेले अर्थतज्ज्ञ नेहमी केवळ पश्चातबुद्धीनं मल्लिनाथी करत राहतात; कोणत्याही वित्तीय वा आर्थिक संकटांची ना त्यांना पूर्वसूचना मिळते, ना त्या समस्येवरचा उपाय त्यांच्यापाशी असतो, अशी टीका नेहमीच केली जाते. परंतु, अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये हातपाय पसरत असलेल्या सबप्राइम कर्जांच्या फैलावात कोणत्या अरिष्टाची गर्भधारणा घडते आहे, याचा अचूक वेध घेतलेल्या जगातील मोजक्या चार-पाच अर्थवेत्त्यांमध्ये राजन यांची गणना होते. अखेरीस १५ ऑक्टोबर २००८ रोजी अमेरिकी सबप्राइम कर्जांचा फुगा फुटला. मात्र, त्याच्या आधी तब्बल तीन वर्षं, म्हणजे २००५ सालीच, अमेरिकेतील कन्सास इथं आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेमध्ये सादर केलेल्या आपल्या संशोधनपर निबंधात राजन यांनी, सबप्राइम कर्जांच्या डोलाऱ्यातून जागतिक अर्थकारणात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य वित्तीय संकटाचं सूचन घडवलेलं होतं. त्यांच्या त्या निबंधानं अभ्यासक व धोरणकर्ते यांच्या विचारविश्वात तेव्हा प्रचंड घुसळण झाली. त्यांच्यावर काही गोटांतून टीकेचा भडिमारही झाला, परंतु ते अवचल राहिले. स्वत:वरील टीकेमुळे विचलित न होता अभ्यासांती पक्की झालेली आपली धारणा उचित अशा व्यासपीठावरून मांडत राहण्याचा हाच राजन यांचा बाणा ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाल्यानंतर पुढे वेळोवेळी प्रत्ययास आला.
शिकागो विद्यापीठातील कार्यालयात काम करताना
त्यानंतर लगेचच, म्हणजे, २००७ साली राजन यांचा भारतीय अर्थकारणाशी अर्थप्रशासक या नात्यानं संबंध प्रस्थापित झाला. देशाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा सुचवण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या एका उच्चस्तरीय अभ्याससमितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. पुढील चार वर्षं, म्हणजे, २००८ ते २०१२ या काळात तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे आर्थिक सल्लागार म्हणून राजन कार्यरत राहिले. केंद्रीय अर्थमंत्र्यांचे मुख्य अर्थसल्लागार म्हणून २०१२-१३ असं एक वर्ष काम केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३वे गव्हर्नर म्हणून राजन यांनी सूत्रं हाती घेतली. अतिशय लहान वयात त्या पदावर आरूढ होण्याचा मान त्यांच्या वाट्याला आला. २०१६ सालापर्यंतची तीन वर्षं त्यांनी त्या पदाची धुरा सांभाळली आणि त्या पदावर अधिक काळ काम करणं हे, आत्मसन्मान जागृत असणाऱ्या कोणाही व्यक्तीला अशक्य व्हावं अशा प्रकारचं वातावरण व परिस्थिती व्यवस्थेच्या धुरीणांनी निर्माण केल्यानंतर पुन्हा एकवार अ‍ॅकेडमिक्सकडे वळण्याचा निर्णय घेत ६ सप्टेंबर २०१६ रोजी त्या पदावरून पायउतार झाले.
अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ हा मूलत: सामाजिक वास्तवाचा अभ्यासक-विश्लेषक असतो, हे वास्तव अनेकदा नजरेआड केलं जातं. परिणामी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासारख्या संवेदनशील खुर्चीवर आरूढ झालेल्या व्यक्तीनं केवळ वित्तीय धोरणविषयक बाबींसंदर्भातच आपली मतं नोंदवावीत अशी राजकीय व्यवस्थेतील धुरीणांची अपेक्षा असते. २०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या राजकीय व्यवस्थेचा राजन यांच्याबाबतचा अंदाज चुकला तो नेमका इथंच. राजन हे जागतिक लौकिक प्राप्त केलेले अव्वल अर्थतज्ज्ञ असले तरी ते पठडीबंद व झापडग्रस्त अर्थपंडित नाहीत, याचा अदमास कोणालाच नव्हता. रिझर्व्ह बँकेच्या थेट कार्यकक्षेत न बसणाऱ्या, परंतु व्यापक आर्थिक हिताच्या दृष्टीनं मोलाच्या ठरणाऱ्या केंद्र सरकारच्या काही धोरणांसंदर्भात राजन यांनी सडेतोड टिपण्या करताच, केवळ ‘मन की बात’च ऐकण्याची व ऐकवण्याची खोड जडलेल्यांच्या भुवया ताणल्या गेल्या. ताणतणाव आणि तणातणीची दरी वाढतच राहली आणि अखेर राजन यांनी पुन्हा अमेरिकेचा रस्ता धरला.
पुस्तकातील अर्थकारण जेव्हा व्यवहारात उतरतं, तेव्हा आधारासाठी त्याला राजकारणाचा पांगुळगाडा लागतोच. ते विशुद्ध इकॉनॉमिक्स नसतंच. त्या विषयाचं बारसं मग ‘पोलिटिकल इकॉनॉमी’ असंच केलं जातं. रघुराम राजन यांची पोलिटिकल इकॉनॉमीवर फार उत्तम पकड आहे. व्यवहारात ते खुल्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे खंदे समर्थक आहेत. परंतु, खऱ्या अर्थानं बाजारपेठा खुल्या होण्यात अगर करण्यात राजकीय व्यवस्थेतील धटिंगणांचे स्वार्थ कसे ठायीठायी आड येतात आणि परिणामी निखळ मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे नव्हे, तर वस्तुत: भ्रष्ट व अकार्यक्षम आणि (वरकरणी) खुल्या बाजारपेठीय व्यवहारांच्या चलनवलनाचे आपण सगळेच कसे बळी ठरत असतो, याचं त्यांचं आकलन कमालीचं पायाशुद्ध आहे. निखळ स्पर्धेवर बेतलेल्या बाजारपेठीय व्यवहारांचे दूरगामी लाभ समाजातील सर्वच घटकांना कमी-अधिक प्रमाणात होतच असतात; परंतु, मुक्त स्पर्धेपायी आपल्या प्रस्थापित हितसंबंधांना बाधा निर्माण होण्याच्या भीतीपायी अर्थव्यवस्थेतील दांडगे प्रस्थापित खेळाडू राजकीय व्यवस्थेतील वजनदारांशी संगनमत करून शुद्ध स्पर्धेचा माहोल व्यवहारात कधीच उतरू नये याची तजवीज कशी करत असतात, याचा राजन यांनी अतिशय जवळून व बारकाईनं अभ्यास केलेला आहे. ‘सेव्हिंग कॅपिटॅलिझम फ्रॉम द कॅपिटलिस्टस्’ या पुस्तकात त्यांनी हाच सगळा कार्यकारणभाव उलगडून सांगितला आहे.
अर्थकारण आणि राजकारण या दोहोंत एक अतिशय मूलभूत असं द्वंद्व नांदतं. राजकारण हे तात्कालिकावर बेतलेलं असतं, तर अर्थकारणात लगोलग काहीच साध्य होत नाही. त्यामुळे ताबडतोबीच्या राजकीय लाभांपायी अर्थकारणाला वेठीस धरण्याचा मुजोरपणा राजकीय व्यवस्थेतील धुरीण सरसहा करत असतात. २००८ सालातील ऑक्टोबर महिन्यात अमेरिकी अर्थव्यवस्थेत फुटलेला सबप्राइम कर्जांचा फुगा हे अशाच राजकीय बेगुमानीचं फलित होतं, हे वास्तव राजन यांनी त्यांच्या ‘फॉल्ट लाइन्स’ या अलीकडील पुस्तकात अतिशय तपशीलवार, परंतु कमालीच्या वाचनीय शैलीमध्ये मांडलेलं आहे.
रघुराम राजन यांची दोन बहुचर्चित पुस्तकं
सबप्राइम कर्जांचं प्रकरण हे वरकरणी आर्थिक दिसत असलं तरी त्याची निपज शुद्ध राजकीय हाराकिरीमधून झालेली आहे, हे राजन बिनतोडपणे मांडतात. मुळात उच्च शिक्षणाच्या अमेरिकी व्यवस्थेतील संरचनात्मक पेचापायी श्रमांच्या अमेरिकी बाजारपेठेत उद्भवलेल्या असमतोलामुळे अमेरिकी मध्यमवर्गामध्ये प्रचंड प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली. ती अस्वस्थता शांतवण्यासाठी अमेरिकी शिक्षणव्यवस्थेत तसंच श्रमांच्या बाजारपेठेत कराव्या लागणाऱ्या संरचनात्मक सुधारणा वेळखाऊ ठरल्या असत्या. तेवढा संयम अमेरिकी राज्यकर्त्यांपाशी कुठला असायला? आर्थिक उन्नती साध्य करण्याबाबत अमेरिकी मध्यमवर्गाची झालेली कोंडी मतपेटीच्या माध्यमातून आपल्यावर शेकू नये यासाठी, कुंठत बनलेल्या मध्यमवर्गाची खर्चाळू उपभोगलालसा बेबंदपणे कर्जं वाटून शमवण्याचा जुगार अमेरिकी राज्यकर्ते व धोरणतज्ज्ञ खेळले. त्याच बेगुमानीची कडवट फळं उभी जागतिक अर्थव्यवस्था आज भोगते आहे. म्हणजे, अमेरिकी सबप्राइम कर्जांच्या फुग्याचं वरपंग आर्थिक भासत असलं तरी त्याची उत्पत्ती हस्व दृष्टीच्या राजकारणातून झालेली आहे, याचा उलगडा राजन यांनी सम्यकपणे पुस्तकरूपानं मांडलेला आहे.
अर्थकारण आणि राजकारण यांच्या आंतरसंबंधांची इतकी प्रगल्भ जाण असल्यामुळेच, राजकीय तसंच सामाजिक बाबतींतील असहिष्णुता व त्यातून जन्माला येणारा विद्वेष देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मुळावर बेतेल, असा राजन यांनी दिल्लीश्वरांना दिलेला नि:संदिग्ध इशारा म्हणजे उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. समाजव्यवस्थेच्या या जबाबदार जागल्याला रोखण्यासाठी मग मोर्चेबंदी केली गेली. स्पष्टवक्ता आणि नि:स्पृह विचारवंत राजकीय व्यवस्थेला परवडणारा नसतो, हेच खरं!

लेखक पुण्यातील अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक आहेत.
agtilak@gmail.com

आशीष नंदी : ‘आपण संकटात आहोत’-- मुलाखत – पंकज श्रीवास्तव, मराठी अनुवाद – अजित वायकर

आशीष नंदी : ‘आपण संकटात आहोत’
दिवाळी २०१६ - मुलाखत 
मुलाखत – पंकज श्रीवास्तव, मराठी अनुवाद – अजित वायकर
  • विचारवंत आशीष नंदी. खालील छायाचित्रात इराणी विचारवंत रामिन जहाबेंग्लू व नंदी
  • Fri , 28 October 2016

आशीष नंदी हे आजमितीस निर्विवादरीत्या भारतातील प्रभावशाली बुद्धिमंतांपैकी एक आहेत. त्यांच्या लोकविलक्षण निरीक्षणांमुळे ते जसे आदरास पात्र ठरले आहेत, तसंच वादांचं कारणदेखील बनले आहेत. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या नंदी यांनी राजकारण, संस्कृती, क्रिकेट, सिनेमा आदी विषयांवरदेखील विस्तृत लिहिलं आहे. राजकीय मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. नागरी संस्कृती, राजकीय संस्कृती, झुंडीचं मानसशास्त्र, जमावाच्या हिंसाचारामागील मानसिकता हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.बिहारमधील भागलपुरात जन्मलेल्या, कोलकात्यात शालेय आणि नागपुरात महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या आशीष नंदी यांनी गुजरात विद्यापीठातून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पीएच.डी. मिळवली आहे. दिल्लीस्थित ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी’ (CSDS) या संस्थेमध्ये ते वरिष्ठ अभ्यासक आणि संचालक होते, आता मानद फेलो आहेत. त्यांना २००७ साली आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फुकुओका एशियन कल्चर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ‘कार्नेज इन्डाऊमेंट फॉर इंडरनॅशनल पीस’च्या ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकानं जगातील प्रमुख १०० विचारवंतांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. आजच्या भारतातील वर्तमान परिस्थितीची चर्चा करणारी ही त्यांची मुलाखत…
सद्य भारताबाबत आपलं काय आकलन आहे?
भारत ही जिवंत, बहुरंगी लोकशाही आहे. परंतु, तिची वाटचाल वेगानं गुन्हेगारीकरणाकडे होत आहे. तसंच, इथं केवळ सत्तारूढ पक्षातच नव्हे (जी आता एका व्यक्तीपुरतीच मर्यादित बनली आहे.), तर इतर पक्षांमध्येदेखील हुकूमशाही तत्त्वांचं बळकटीकरण होत आहे, या लालकृष्ण अडवाणी यांच्या मताशीदेखील मी सहमत आहे. पक्षांतर्गत स्पर्धेलादेखील वाव नसल्याचं चित्र जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहे. ते इतर पक्षांशी स्पर्धा करतात. पक्षांतर्गत स्पर्धा इथं होत नाही. पक्षांमध्ये लोकशाही संरचना राहिलेली नाही. सध्याच्या भारतीय राजकीय संस्कृतीबद्दल मी फारसा आशावादी नाही. कारण, भव्यदिव्य विकासाची कास धरलेल्या सर्व समाजांनी हुकूमशाही व्यवस्थेची वाट पकडली होतीच. आपल्यालादेखील हा धोका आहे, अशी भीती मला वाटते. एनजीओ, प्रसारमाध्यमं आणि न्यायव्यवस्थेला बदनाम करणं, हे त्याच दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. अशा प्रकारचे प्रयत्न पूर्वीच्या राजवटीमध्येदेखील झाले असून सध्याच्या सरकारकडूनही तोच कित्ता गिरवण्यात येत आहे. हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी आशादायी नाही. केवळ नरेंद्र मोदी अथवा भाजपला दूर करून हुकूमशाहीचं संकट टाळता येईल, अशा भ्रमात कुणी असेल, तर तो मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहे.
२००२च्या गुजरात दंगलींच्या दशकभर अगोदर तुम्ही नरेंद्र मोदी यांना भेटला होतात. त्यानंतर तुम्ही फॅसिझमचं चपखल उदाहरण म्हणून त्यांचं वर्णन केलं होतं. आता ते पंतप्रधान आहेत. तुमचं त्यांच्याबद्दलचं काय आकलन आहे?
मोदी अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. या काळात ते बऱ्याच गोष्टी शिकले. आता राजकीय व्यवस्था आपल्यासमोर झुकणार नाही; आपल्याला तिच्यासमोर झुकावं लागेल, हे त्यांना उमगलं आहे. त्यांनी आपल्या सार्वजनिक भूमिका मवाळ केल्या असल्या तरी त्यांची राज्यकारभाराची पद्धत मात्र अजूनही एककल्लीच आहे. विशेषत: इतर पक्षांच्या नेत्यांना ते खिजगणतीतही धरत नाहीत. स्वतःच्या पक्षांत त्यांची मदार नोकरशहा आणि नोकरशहांप्रमाणे वागणाऱ्या राजकारण्यांवर असते. राजकारण्यांपेक्षा त्यांची पसंती नोकरशहांना असते.
मोदी सरकारनं गेल्या आणि या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अधिकारी आणि सैनिकांसह हजारोंच्या संख्येनं लोक पंतप्रधानांसमवेत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याकडे आपण कसं पाहता?
राजकारणातील कळीचे मुद्दे आणि माध्यमांच्या आभासी वास्तवापासून दूर लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय योगदिन. योगाचं राजकियीकरण करता येऊ शकतं अथवा तो माध्यमांचं आकर्षण बनवता येऊ शकतो अथवा त्याची गिनीज बुकात नोंद होऊ शकते, याची कल्पना मी केली नव्हती. भारतीय राजकारण कमालीचं माध्यमकेंद्री बनू लागलं आहे. मोदी त्याच संस्कृतीचा भाग आहेत, जिची मदार भव्यदिव्य राजकारण, चटकदार भाषणं आणि चमकदार पेहराव यांच्यावर आहे. आपलं दृश्य अस्तित्व अधिक महत्त्वाचं आहे, असं त्यांना वाटतं. हा प्रकार आपण अमेरिकेतून आयात केला आहे. तो तिथल्या अध्यक्षीय राजकीय प्रक्रियेचा भाग आहे. इथल्या सर्व लोकशाही राजकीय व्यवस्थांमध्ये तिचा शिरकाव झालेला आहे. मी पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासारख्या कंटाळवाण्या आणि रूक्ष राजकारण्यांचा मोठा भक्त आहे. कारण, त्यांना गंभीर मुद्द्यांवर निवडणूक जिंकायची असायची. आपला पेहराव, दिसणं, छापील नावांचे सूट, त्वचेचा रंग, भाषणकौशल्य अथवा सुंदर मैत्रिणींचा भरवसा अशा गोष्टींनी ते निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नसत. काम आणि राजकारण यांच्या माध्यमातून त्यांना आपली युद्धं जिंकावी लागत.
परंतु, भारतीय मध्यमवर्ग अशा प्रकारच्या भव्यदिव्यतेच्या राजकारणाचा आनंद लुटतोय, असं तुम्हाला वाटत नाही का? अगदी बुद्धिवादी मंडळीसुद्धा शेतकरी आत्महत्या आणि मानवाधिकार उल्लंघन यांसारख्या विषयांना हात घालताना दिसत नाहीत.
त्याचं एक कारण म्हणजे, आपली माध्यमं बिनमहत्त्वाच्या गोष्टींभोवती फिरत आहेत आणि राजकारण अधिकाधिक माध्यमकेंद्री बनत चाललं आहे. वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पक्षांमध्ये रोज भांडणं लावण्यात येतात आणि विशेषज्ञांनी या पक्षांमध्ये मध्यस्थी करणं अपेक्षित असतं. आपल्याला जे बोलायचं नाही, ते न बोलण्याची अथवा ज्या गोष्टी समजल्या नाहीत, त्यांच्यावर भाष्य न करण्याची भूमिका घेण्याचं धैर्य बुद्धिवाद्यांनी दाखवलं पाहिजे. माध्यमं वाईट आहेत, असं मी म्हणत नाही. बऱ्याचदा ते महत्त्वाच्या विषयांना हात घालतात आणि धैर्यही दाखवतात. पण, असे प्रकार आक्रसत चालले आहेत. परिणामी, माध्यमं आपली विश्वासार्हता गमावू लागले आहेत. म्हणूनच कॉर्पोरेट संस्था प्रसारमाध्यमं विकत घेऊ लागली आहेत. तथापि, राजकारणी आणि माध्यमांबद्दलची लोकांमधील वाढती साशंकता भविष्यात सुदृढ लोकशाहीसाठी उपयुक्त ठरू शकते. माध्यमांचा पाठिंबा आणि प्रचारयंत्रणा असूनदेखील मोदींची लोकप्रियता ढासळत असल्याचं सर्वेक्षणांतून पुढं आलं आहे. हा मौखिक संभाषणांचादेखील देश आहे. अन्यथा, आणीबाणी कधीच उठली नसती आणि ज्या पद्धतीनं भाजप दिल्लीच्या निवडणुका हरलं, त्या पद्धतीनं हार झाली नसती.
तुम्ही बंगाली पुनरुज्जीवनवादाच्या चळवळीत काम केलं आहे. त्यात बुद्धिवाद्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा प्रकारची पुनरुज्जीवनवादी चळवळ हिंदीभाषक पट्ट्यात न झाल्यामुळे तिथं जातीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाची मुळं घट्ट आहेत, असं वाटतं का?
भारताच्या काही भागांमध्ये वेगळ्या पद्धतीनं पुनरुज्जीवनवादाची चळवळ झाली. शूद्र आणि दलितांच्या सबलीकरणात बंगाली पुनरुज्जीवनवादानं कुठलीही भूमिका बजावलेली नाही. असाच प्रकार भारताच्या इतर भागांतही घडला. आता आपल्यासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. साम्राज्यवादी शासनकर्त्यांनी ज्या गोष्टी केल्या नाहीत, त्या गोष्टी आताच्या राजकारणातून साध्य करता येतील, असं आपल्याला वाटतं. अर्थात अनेक महत्त्वाचे उपक्रम सध्याच्या राजकारणाच्या माध्यमातून राबवले गेले, यात शंका नाही. परंतु, आपले महत्त्वाचे राजकारणी स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आले होते. त्यांना भारताच्या विविधतेचं व्यवस्थित ज्ञान होतं. इथल्या राजकारणानंच शिक्षणक्षेत्राची उभारणी केली. एकच राष्ट्रभाषा असावी, अशी अनेकांची मागणी असतानाही ३० राष्ट्रभाषा ठेवण्याची मुभा आपल्याला इथल्या राजकारणानं दिली. आता मी अवतीभोवती धनाढ्य, गलेलठ्ठ आणि पेज थ्री राजकारणी पाहतो; जे उद्धट, हिंसक आणि भ्रष्टाचारी आहेत.
मतांचं राजकारण हा देशाच्या लोकशाहीकरणाच्या आणि आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतला अडथळा आहे, असा याचा अर्थ होतो का?
नाही. याचा अर्थ असा आहे की, आपल्याकडील सध्याचा राजकीय वर्ग हा आपल्या राजकीय गुंतवणुकीवरील भाडेवसुली करणारा आहे. अशा प्रकारचे विरोधाभास त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, जिथं शतकांपासून निर्बल आणि दुर्लक्षित राहिलेल्यांच्या सामाजिक अभिसरणासाठी राजकारण हा मुख्य मार्ग बनला. राजकारणात यशस्वी होण्यासाठीच्या आणि पुन्हा विस्थापित न होण्यासाठी खबरदारी घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांत लबाडीचा अंश बऱ्याचदा आढळतो. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अस्तित्व त्यावरच अवलंबून असतं. आजघडीला कला-संस्कृतीसारख्या क्षेत्रांत आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. आपलं मत मुक्तपणे व्यक्त करणं अवघड बनत चाललं आहे. उदाहरणार्थ, भारताच्या आण्विकीकरणाला देशाच्या अनेक पंतप्रधानांसकट कित्येकांनी विरोध केला आहे. पण, तमीळनाडूतील शेती आणि मासेमारी करणाऱ्या तीन हजारांहून अधिक गावकऱ्यांच्या माथी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा चिकटवण्यात आला आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांना ‘देशद्रोह’ हा शब्ददेखील उच्चारता येत नाही.
आपलं विकासाचं प्रारूप हे ग्रामीण भाग अथवा दुर्लक्षित घटकांप्रती संवेदनशील नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
या विषयावर कुठलाही गोंधळ नको. समाजातील काही लोकांनी बलिदान देणं आवश्यक आहे, असं सध्याच्या विकासाच्या प्रारूपाने गृहित धरलं आहे. जेव्हा जेव्हा उच्चभ्रूंनी तत्काळ प्रगती अथवा आधुनिकीकरणाचा हव्यास धरला आहे, तेव्हा तेव्हा हे घडलेलं आहे. दक्षिण कोरियातील सिंगमन–ही, तैवानचे चँग कै शेक, फिलिपाईन्सचे फर्डीनांड मार्कोस, मलेशियाचे महाथीर मोहंमद आणि सिंगापूरचे ली कुआन यू, ही मंडळी त्यांच्या लोकशाही स्वातंत्र्याप्रतीच्या कटिबद्धतेसाठी ओळखले जात नाहीत. चीनच्या सद्यकालीन राज्यकर्त्यांविषयीदेखील असं म्हणता येत नाही. जेव्हा जेव्हा एखादा देश विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा तेथील हुकूमशाही तत्त्वांचं बळकटीकरण होतं. भूमी अधिग्रहण कायद्याला खिळखिळा करण्याचा होत असलेला प्रयत्न, हे त्या दिशेनंच टाकलेलं एक पाऊल आहे. मी पारंपरिक विकासाचं प्रारूप आणि त्यामुळे होणारं नुकसान यांचा टीकाकार आहे. मला तसं म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसं म्हटल्यानं कुणीही देशद्रोही ठरत नाही.
भाजपप्रणीत सरकार अनेक गोष्टी करत आहे. भाजप विरोधी पक्षात असताना ज्यांचा विरोध करत होता, आता त्यांच्या विचारधारेला काय झालं आहे?
आमच्या संस्थेनं ( सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) केलेल्या अभ्यासात केवळ १० टक्के लोकांनी भाजपला विचारधारेच्या मुद्द्यावर मतदान केल्याचं समोर आलं आहे. एका सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात केवळ साडेसात टक्के जनतेनं भाजप-शिवसेनेला विचारधारेच्या मुद्द्यावर मतदान केलं आहे. महाराष्ट्र हा हिंदू राष्ट्रवादाचा बालेकिल्ला समजण्यात येतो. वस्तुतः, आजमितीस विचारधारा हा काही महत्त्वाचा मुद्दा होऊ शकत नाही. विचारधारेचं महत्त्व आणखीनच कमी होत चाललं आहे. डोळ्याचं पातं लवण्याच्या आत लोक मार्क्सवादावरून हिंदू राष्ट्रवादावर आणि हिंदू राष्ट्रवादावरून गांधीवादावर उड्या मारत आहेत. परंतु, ज्याप्रमाणे आपण १९६०-७०च्या काळात विचारधारांबद्दल बोलत होतो, तसे आता बोलू शकत नाही. अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये धर्मश्रद्धा तेवढ्या बळकट राहिलेल्या नाहीत. लोकांना आयुष्याला अर्थ देण्यासाठी त्यांच्या विचारधारांवर अवलंबून राहावं लागत आहे. परंतु, भारतासारख्या देशातील लोक आपली मूल्यं धर्मश्रद्धांकडून मिळवतात. त्यामुळे विचारधारा हे त्यांच्यासाठी केवळ एक साधन आहे. त्यांच्यासाठी विचारधारा हे राजकारण, व्यवसायबांधणी आणि विकासासाठीचं केवळ तंत्रज्ञान आहे.
घरवापसीसारखी मोहीम आणि काही भाजप नेत्यांनी अल्पसंख्याकांबद्दल केलेली विखारी भाषणं यांचं विश्लेषण तुम्ही कसं करता? आपण त्यांना ‘समाजकंटक’ म्हणू शकू का?
होय. असे समाजकंटक कायम राहणारच. सध्या त्यांना जास्त अवकाश मिळतो आहे. शहाण्यांना प्रसिद्धी मिळत नाही, मूर्ख आणि विकृतांना मिळते, हे समाजातील असंतोषाचं लक्षण आहे. तसंच, उच्चजातीय हिंदू लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमुळे सत्ता गमावू लागले आहेत. त्यांच्यामध्येदेखील असंतोष आहे. परंतु, आपण ब्राम्हण, क्षत्रिय अथवा बनिया म्हणून दुर्लक्षित केले जात आहोत, असं म्हणण्याऐवजी आपण हिंदू म्हणून दुर्लक्षित केले जात आहोत, असं म्हणणं त्यांना सोयीस्कर वाटू लागलं आहे. अशा प्रकारचं विस्थापन आपल्याला इतर क्षेत्रांमध्येही झालेलं पहायला मिळेल. आपण आदिवासींचं ६५ वर्षांपासून शोषण केलं आणि परिणामस्वरूपी, ते माओवाद्यांचे पाठीराखे बनले. सुमारे ९० टक्के माओवादी मंडळी जरी उच्चारायला अवघड नसलं तरी ‘माओ’ हा शब्द उच्चारू शकत नाहीत. आपले नेतेदेखील त्यांना ब्रिटिशांनी जशी वागणूक दिली, तशीच वागणूक देत आहेत.
मग आपल्या संविधानाची विचारधारा काय आहे?
आंबेडकर हे कुशाग्र बुद्धीचे कायदेतज्ज्ञ आणि आदर्श उदारमतवादी होते. इतर समाजांमधील उदारतमतवादाने वेगवेगळे मार्ग पकडले, परंतु भारतात त्यानं क्रांतिकारी बदल घडवले. इथं निम्नवर्गीय अथवा त्यांच्या पाठीराख्यांच्या हुकूमशाहीला वाव नाही. आंबेडकर स्वतः दलित असले तरी दलित अथवा शूद्रांच्याही हुकूमशाहीला वाव नाही. भारतीय संविधान मुक्त विचारधारेचं आहे. तुम्ही त्याला आंतर-विचारधारीय म्हणू शकता.
तुमचं भारताबद्दलचं स्वप्न काय आहे?
मला करुणामय, मानवी मूल्यांची बूज राखणारा समाज हवा आहे. सहवेदना आणि कणवेतून येणाऱ्या मूल्यांनी बनलेला समाज मला हवा आहे, परंतु ते उत्तरोत्तर अवघड बनत चाललं आहे. युरोपीय बुद्धिवादानं तर्काधिष्ठित मूल्यांचा आग्रह धरला. तर्कावरील अवाजवी भरामुळे राज्ययंत्रणेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हृदयविहीन, वस्तुनिष्ठ आणि भावरहित झाला. आपल्या दुःखाची मूळ जननी म्हणजे हा दृष्टिकोन आहे. विकासाच्या नावाखाली आपण आज लाखो लोकांचं बलिदान देण्यास आणि हजारो छोट्या संस्कृतींचा नाश करण्यास तयार आहोत. भारत ही लक्षावधी नव्या आणि तरंगत्या निम्नवर्गीय प्रोलॅटरिएट लोकांची भूमी बनली आहे. स्वतःला विकासाचे तज्ज्ञ समजणारी मंडळी या लोकांकडे प्रयोगशाळेतील प्राणी म्हणून पाहत आहेत. मी गांधीवादी नसलो, तरी गांधींना चाणक्यापेक्षा मोठा मार्गदर्शक समजतो. गांधी हे सर्वाधिक समकालीन विचारवंतांपैकी एक आहेत.
परंतु, तुम्ही म्हटल्यानुसार महान क्रांतिकारी असणाऱ्या आंबेडकरांनी गांधींना आव्हान दिलं होतं. आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणं गांधींनी शोषक जातव्यवस्थेला पाठिंबा दिला होता.
गांधींचा व्यवसायाधारित उतरंडविहीन वर्णव्यवस्थेला पाठिंबा होता. उच्चजातीय लोकांची जीवनशैली व श्रेष्ठत्वाची कल्पना, जिच्यावर अनेक उच्चशिक्षित दलितदेखील विश्वास ठेवतात, ती गांधीजींनी नाकारली होती. श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व समजावं, म्हणून ब्राम्हणांनी दलित अथवा शूद्र बनावं, अशी गांधीजींची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या उच्चजातीय अनुयायांना पहिलं काम आश्रमातील स्वच्छतागृहांच्या साफसफाईचं दिलं. मला वाटतं, ब्राम्हणी अथवा क्षत्रिय जीवनशैलीचं अनुकरण करण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा स्वच्छतागृहं साफ करण्याची ही कृती तात्त्विकदृष्ट्या अधिक भव्य होती. त्यातूनच तशा प्रकारच्या जीवनशैलीला त्यांनी एक प्रकारे अधिमान्यता मिळवून दिली. उच्चजातीयांकडे आपल्या भूतकाळाबद्दल लाजीरवाणं वाटण्याजोगी कारणं आहेत; अतिशूद्र आणि दलितांकडे ती नाहीत. भारतात अनेक कौशल्यं जातींमुळे टिकून राहिली. त्यामुळे गांधींनी सर्वप्रथम अस्पृष्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. उच्चजातीयांनी कनिष्ठजातीयांना प्रतिष्ठाहीन जगणं जगण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यामुळे अस्पृष्यता नष्ट करण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं, ही उच्चजातीयांचीच जबाबदारी आहे, ही बाब गांधींनी स्पष्ट केली होती.

(www.governancenow.com या संकेतस्थळावर १४ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झालेल्या मुलाखतीचा अनुवाद.)